Monday, 19 July 2021

भारतीय राज्यघटनेचे सुलेखनकार - प्रेमबिहारी नारायण रायजादा


भारतीय राज्यघटनेचे सुलेखनकार - प्रेमबिहारी नारायण रायजादा.


आपल्यापैकी बर्‍याचजणांना माहित नाही की भारताची राज्यघटना हातांनी लिहिलेली आहे.
संपूर्ण संविधान लिहिण्यासाठी कोणतेही साधन वापरले गेले नाही.

दिल्लीतील रहिवासी प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी स्वत: च्या हातांनी हा संपूर्ण ग्रंथ संपूर्ण संविधान लिहिलेे आहे .

प्रेम बिहारी हे त्या काळातील प्रसिद्ध सुलेखन लेखक होते. त्याचा जन्म १ डिसेंबर १९०१ रोजी दिल्ली येेथे प्रसिद्ध लेखन संशोधकांच्या कुटुंबात झाला. तरुण वयातच त्याने त्याचे आईवडील गमावले. ते आजोबा राम प्रसाद सक्सेना आणि काका चतुर बिहारी नारायण सक्सेना यांच्या समवेत राहत. त्याचे आजोबा राम प्रसाद हे सुलेखक होते. ते पर्शियन व इंग्रजी भाषेचा अभ्यासू होते. त्यांनी इंग्रजी सरकारच्या उच्चपदस्थ अधिकााऱ्यांनाां पर्शियन भाषेचे शिक्षण दिले.
 आजोबा रामप्रसाद सक्ससेना त्यांना लिखाणातून लहानपणापासूनच प्रेमबिहारीना साकारण्यासाठी कॅलिग्राफी कला शिकवत असत. इयत्ता पहिलीनंतर. स्टीफन कॉलेज, दिल्ली येेेेथे प्रेम बिहारी यांनी आजोबांकडून शिकलेल्या सुलेखन कलेचा सराव करण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याचे नाव सुंदर लिखाणांकरिता चोहोबाजूने पसरू लागले. घटना छपाईसाठी तयार झाल्यावर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी प्रेमबिहारी बोलावले. नेहरूूूूनां प्रिंटऐवजी हस्तलिखित कॅलिग्राफीमध्ये संविधान लिहिलेले हवे होते.

म्हणूनच त्याने प्रेम बिहारी बोलावले.. प्रेम बिहारी त्यांच्याकडे गेल्यानंतर पंं.नेहरूजींनी त्यांना घटनेस इटेलिक शैलीत हस्ताक्षर करण्यास सांगितले आणि त्यांनी कोणती फी घ्यावी असे विचारले.

प्रेम बिहारी नेहरूजींना सांगितले “एक पैसाही नाही. देवाच्या कृपेने माझ्याकडे सर्व गोष्टी आहेत आणि मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे. "असे बोलल्यानंतर त्यांनी नेहरूजींना विनंती केली की" माझी एक इच्छा आहे , प्रत्येक पानावर मी माझे नाव लिहीन आणि शेवटच्या पानावर मी माझे नाव माझ्या आजोबांच्या नावासमवेत लिहीन. " पं.नेहरूजींनी त्यांची विनंती मान्य केली. हे संविधान लिहिण्यासाठी त्यांना घर देण्यात आले होते. तिथे बसून प्रेमजींनी संपूर्ण घटनेचे हस्तलिखित लिहिले.

लिखाण सुरू करण्यापूर्वी, पं.नेहरूजींच्या आदेशानुसार प्रेम बिहारी नारायण २९ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे तत्कालीन अध्यक्ष श्री राजेंद्र प्रसाद यांच्यासमवेत शाांतीनिकेतन येथे आले. त्यांनी प्रख्यात चित्रकार नंदालाल बासु यांच्याशी चर्चा केली आणि पानाच्या प्रेम बिहारीच्या कोणत्या भागावर लिहायचे आणि नंदालाल बसू पानाच्या उर्वरित रिक्त भागाची सजावट करतात हे ठरविले.

नंदलाल बोस आणि त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी शाांतीनिकेतनमधील निर्दोष प्रतिमांनी ही पोकळी भरून काढली. मोहेनजो-दारोची मुद्रा, रामयाण, महाभारत, गौतमबुद्धांचे जीवन, सम्राट अशोकानेे बौद्ध धर्माची घेतलेली दीक्षा , विक्रामादित्यची बैठक, सम्राट अकबर व मुघल साम्राज्य, महारानी लक्ष्मीबाई, टिपू सुलतान, गांधीजींची चळवळ, नेताजी सुभाष चंद्र बोस व रुपकचित्रेे या सर्वांचा समावेश आहे. त्यांचे रेखाचित्र दागिने.

एकूणच हे भारताच्या इतिहासाचे आणि भौगोलिक चित्रांचे प्रतिनिधित्व करीत आहे. घटनेतील मजकूर आणि परिच्छेदांनुसार त्यांनी चित्रे अतिशय विचारपूर्वक रंगविली.

प्रेम बिहारी यांना भारतीय संविधानाचे सुलेखन लिहिण्यासाठी ४३२ पेनांची आवश्यकता होती आणि त्यांनी ३०३ नीब याकरिता वापरल्या . निबांना इंग्लंड आणि चेकोस्लोवाकियामधून आणले गेले. त्यांनी भारतीय संविधान मंडळाच्या एका खोलीत संपूर्ण घटनेचे हस्तलिखित सहा महिने ठेवले. संविधान लिहिण्यासाठी २५१ पानांच्या चर्मपत्र कागदाचा वापर करावा लागला. घटनेचे वजन ३ किलो ६५० ग्रॅम आहे. घटना २२ इंच लांबी आणि १६ इंच रुंद आहे.

१ फेब्रुवारी, १९८६ रोजी प्रेम बिहारी यांचे निधन झाले. भारतीय राज्यघटनेचे मूळ पुस्तक आता संसद भवन, दिल्लीच्या ग्रंथालयात जतन केले गेले आहे. नंतर, देहरादून मधील भारतीय सर्वेक्षणांच्या देखरेखीखाली काही पुस्तके छापण्यात आली आहेेत.



मिलिंद आरोलकर.

Wednesday, 14 July 2021

१५ जुलै १९२६:- मुंबईत बेस्ट बस सुरू झाली.




१५ जुलै १९२६:- मुंबईत बेस्ट बस सुरू झाली

बेस्ट (बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम) बस वाहतूक सुरु झाली.
बेस्ट ही भारतातल्या सगळ्यात मोठ्या शहरी परिवहन सेवांपैकी एक मानली जाते. मुंबईच्या कुठच्याही भागात जायला बेस्टची सेवा आहे. नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर अशा बाजूच्या शहरांमध्येही बेस्टची सेवा आहे. भारतातल्या काही नफ्यामध्ये असणार्‍या विद्युत मंडळांपैकी एक नाव म्हणजे "बेस्ट". बेस्ट ही (बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम) मुंबईची दळणवळण व विद्युत सार्वजनिक पुरवठा कंपनी आहे. बेस्टचा जन्म इ.स. १८७४ मध्ये ट्रामवे कंपनीच्या रूपात झाला. आपल्या ट्राम गाड्यांना वीज पुरवता यावी म्हणून बेस्टने वाडीबंदर (नंतरचे बोरीबंदर आणि आजचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथे नोव्हेंबर १९०५ मध्ये औष्णिक वीज केंद्र स्थापन केले त्यातूनच पुढे बेस्टवर मुंबईला वीजपुरवठा करण्याची जवाबदारी आली. १९४७ मध्ये देश स्वतंत्र होण्याच्या एक आठवडा आधीच बेस्ट मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत आली आणि आता महानगरपालिकेच्या अखत्यारीत असूनही, बेस्टचा स्वंतंत्र असा कारभार चालतो.
मुंबई शहराच्या इतिहासात १९ वे शतक अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या शतकाने सात बेटांच्या या शहरात खूप महत्त्वाचे बदल घडवून आणले. ही सात बेटे एकत्रित करून भौगोलिकदृष्टय़ा त्यांचे एक शहर करण्याची प्रक्रिया १८३०मध्ये म्हणजे १९व्या शतकाच्या पूर्वार्धात पूर्ण झाली. त्यानंतर या शतकाच्या उत्तरार्धाची सुरुवात होतानाच १८५३ मध्ये मुंबईत रस्ते आणि रेल्वे या दोन गोष्टींची भर पडली. त्यामुळे एक बंदर आणि व्यावसायिक केंद्र म्हणून शहराचा विकास झाला. शहरातील कापड गिरण्या आणि नव्याने सुरू झालेले मुंबई विद्यापीठ यांमुळे शहराकडे येणारे लोंढे वाढत होते. त्यातच जगाच्या दुसऱ्या टोकाला, अमेरिकेत १८६१ मध्ये सुरू झालेल्या नागरी युद्धामुळे भारतातील कापडाची मागणी खूपच वाढली. याचा परिणाम एकंदरीत शहराच्या वाढीवर न होता, तरच नवल! १८२६ मध्ये केवळ १,६२,५७० एवढीच असलेली या शहराची लोकसंख्या १८७२ मध्ये, म्हणजेच केवळ ४६ वर्षांच्या कालावधीत ६,४४,४०५ एवढी वाढली. एकेकाळी मलेरिया, ताप यांचे शहर अशी ओळख असलेली मुंबई हळूहळू कात टाकत होती.
मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता १८७४ साली बाँम्बे ट्रॅम अँक्ट मंजूर होऊन `बाँम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रँमवेज कंपनी"कडे दोनशे घोडे व वीस ट्रॅमगाड्या आल्या. १९२० साली दुमजली ट्रॅम गाड्या मुंबईच्या रस्त्यांवरून धावू लागल्या होत्या.ट्रॅम वाहतुकीच्या पाहणीत १९१३ साली रिमिंग्टन या अधिकार्याने मुंबईत ट्राँली बस आणायची सूचना केली होती. १९२६ पर्यंत याबाबत काहीही हालचाल झाली नाही. डारडिंपल नावाच्या साहेबाने मात्र जोर लावल्यामुळे मुंबईत ट्राँली बस आणावी की मोटारबस यावर पुन्हा एकदा चर्चा झडली. शेवटी पहिली बस १५ जुलै १९२६ या दिवसापासून प्रायोगिक तत्वावर मुंबईमध्ये पहिली मोटारबस धावू लागली. हे अंतर पार करायला बसला फक्त १० मिनिटे लागत. दादर टीटीपासून पारशी काँलनीतून किंग्ज सर्कलपर्यंत, आँपेरा हाऊसपासून लँमिंग्टन रोडपर्यंत असे त्या मोटारबसचे काही मार्ग होते. मोटारबस सुरु झाल्यानंतर मुंबईकरांमध्ये ती लवकरच लोकप्रिय झाली. मुंबईकरांनी या सेवेचे जोरदार स्वागत केले पण तेव्हा बेस्टची बससेवा उच्च मध्यमवर्गीयांसाठीच आहे असे मानले जाई. असत कारण ट्राम हेच प्रवासाचे स्वस्त साधन होते. म्हणून मुंबईने बससेवा पूर्णपणे आत्मसात करायला वेळ लागला. तोपर्यंत मुंबईत टॅक्सी हे भाड्याचे वाहन रूढ झाले होते. ३१ डिसेंबर १९२६पर्यंत बाँम्बे इलेक्ट्रिकल सप्लाय अँड ट्रॅम कंपनीकडे २४ बसगाड्या झाल्या होत्या. १९२७ सालपर्यंत मुंबईत ४९ लाख प्रवाशांनी या बससेवेचा फायदा घेतलेला होता.
सरकार आणि महानगरपालिका यांच्या विनंतीवरून बेस्ट ने उत्तर मुंबईत आपली सेवा सुरू केली. आणि वाढत्या गर्दीची गरज ओळखून डबलडेकर बस १९३७ मध्ये सुरू झाल्या. त्याकाळी सिंगलडेकर बसमध्ये ३६ प्रवाशांची सोय होत असे. मात्र डबलडेकर बसमध्ये ५८ प्रवासी बसू लागले. दुसर्या महायुद्धाच्या काळात अपरिहार्यता म्हणून बेस्टने सिंगलडेकर गाड्यांच्या टपावर बसण्याची सोय केली. या बसमधून ६० प्रवासी जाऊ शकत. मात्र उन्हाळा व पावसाच्या काळात टपावरील प्रवाशांना बसायला त्रास होऊ लागल्याने हळूहळू ही सुविधा बंद करण्यात आली.मुंबईतील प्रवाशांची वाढती संख्या व कमी बसेस यामुळे प्रवाशांची गर्दी वाढत होती. त्यातून मार्यामार्याही होत असत. म्हणून बेस्ट प्रशासनाला शेवटी बसमध्ये प्रवेश करणार्या प्रवाशांच्या संख्येवर मर्यादा आणणारा कायदा करावा लागला.
छोट्या अंतराच्या प्रवाशांना रांगेमध्ये ताटकळत उभे राहावे लागू नये म्हणून १९६७ साली बेस्टने आँल स्टॅंडिंग बसचा प्रयोग केला. या बसमध्ये मोकळ्या जागांच्या व्यतिरिक्त सर्व प्रवासी उभे राहात. पण ही बस लोकांना आवडली नाही. लोक तिला बकरा गाडी म्हणूलागले. ही बस १९७०मध्ये बंद झाली. पहिली "लिमिटेड" बस १९४० मध्ये कुलाबा ते दादर धावली. दुसर्‍या महायुद्धानंतर ७ ऑगस्ट १९४७ च्या दिवशी "बेस्ट" मुंबई महानगरपालिकेत सामावून घेण्यात आली कालांतराने बॉम्बे चे मुंबई झाले म्हणून "बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय And ट्रान्स्पोर्ट" च नाव बदलून "बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय And ट्रान्स्पोर्ट" असे ठेवण्यात आले. बेस्ट देशातील सर्वात मोठी शहर रस्ता वाहतूक कंपनी आहे. बेस्टचा आदर्श घेऊन देशातील अनेक शहरांनी स्थानिक बस सेवा सुरू केली. मात्र वाहतुकीबरोबरच वीज पुरवठा सेवा पुरवणारी बेस्ट ही एकमेव संस्था. मुंबई महापालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या बरोबरीने बेस्टचा वेगळा अर्थसंकल्प मांडला जातो. तो शिलकीच असतो, हे महत्वाचे.

सध्या काही नालायक, स्वार्थी राजकारणी स्वत:च्या व भांडवलदारांच्या स्वार्थाकरीता ‘बेस्ट' जाणूण बूजूनबंद पाडू पाहत आहेत. आता आपण तमाम मुंबईकरांनी एकत्र येऊन ‘बेस्ट' वाचवलीच पाहीजे. ‘बेस्ट‘ ही मुंबईची शान होती, आहे आणि यापुढेही ती तशीच अबाधीत राहीलीच पाहिजे.


मिलिंद आरोलकर .

Thursday, 1 July 2021

चाळीतल "बिऱ्हाड"....

                       चाळीतल "बिऱ्हाड"...

पूर्वी मुंबईत जेव्हा चाळ संस्कृती होती तेव्हा तिथे राहणाऱ्या कुटुंबांना "बिऱ्हाड" म्हणत. अशी अनेक "बिऱ्हाडं" त्या चाळींमधून दाटीवाटीने रहात असत.

खोल्यांचा आकार स्क्वेअर फुटात मोजायची पद्धत तेव्हा रूढ नव्हती. तेव्हा त्या लहान लहान सिंगल आणि डबल रूम म्हणजे घरं होती. त्यात राहणाऱ्या लोकांचीच नाही तर चाळीतील सर्वांची.

अनेकदा अनेक घरांना वर्षानुवर्षे कुलूप लागत नसे. एकतर घरात इतकी लोकं असत की कोणी ना कोणीतरी घरात सदैव असे. तसेच कोणीच नसेल तेव्हा कुलूप लावण्यापेक्षा "वहिनी / काका मी जरा बाजारात जाऊन येते आहे. जरा लक्ष ठेवा."
इतके शेजाऱ्याना सांगून दार सत्ताड उघडे टाकून जाण्याइतपत विश्वास असलेला शेजार तेव्हा होता.

वर्षानुवर्षे, दोनेक पिढ्या एकत्र राहिलेली, फक्त सिंगल विटांच्या भिंतीने वेगळी असलेली अनेक लोकं "चाळकरी'  नामक एका मोठ्या कुटुंबाचा भाग होती!

हळूहळू फ्लॅट संस्कृती बोकाळू लागली. गरज, चैन, दिखावा अश्या विविध कारणांनी लोकं मुंबई सोडून उपनगरात जाऊ लागली.

मग एखाद्या सकाळी चाळीच्या दाराजवळ एक ट्रक लागायचा. 'अमुक एक बिऱ्हाड चाळ सोडून जातंय...' अशी खबर यायची. चाळीतील तमाम मंडळी सार्वजनिक गॅलरीत उभी राहून "बिऱ्हाड जाण्याचा" कार्यक्रम बघत असायची.

कामाला आलेले हमाल एकेक कपाट, पलंग, खुर्च्या, टेबल्स, भांडीकुंडी, खेळणी, कपडे अश्या वस्तू जिन्यावरून उतरवत ट्रक मध्ये मांडून ठेवायला सुरुवात करत. त्यातील कित्येक भांडी कित्येकदा चाळीतील अनेकांच्या घरात काहीतरी गोडधोड भरून आलेली असायची. एखादी बॅग किंवा खेळणं एखाद्या वाढदिवस किंवा लग्नात चाळकऱ्यानीच भेट दिलेलं असायचं!

हळूहळू घर रिकामं व्हायचं. भिंतीवर, छतावर आणि जमिनीवर त्या कुटुंबाच्या वास्तव्याच्या अनेक खुणा दाखवत असलेलं ते घर आता एक भकास खोली बनून राहायचं. त्या घरात खेळलेली मुले, गप्पा आणि चहाड्यांचे फड जमवलेल्या शेजारणी, गणपतीच्या आरतीत चुरशीने देवे म्हणलेली तरुण पोरे त्या घराचे काही तासात संपलेले अस्तित्व चाळीच्या कठड्यावर हनुवटी टेकवून बघत राहायची.

ट्रक भरला की ते कुटुंब सर्वांचा निरोप घ्यायला यायचे. इतका वेळ धरून ठेवलेले भावनांचे बांध फुटायचे. एकमेकांना मिठ्या मारून -

"रविवारी, गणपतीला भेटूच..... फार लांब नाहीये..... ट्रेनने तासभर आणि स्टेशन पासून चालत दहा मिनिटे..... नक्की या, येऊ....! काळजी घ्या रे बाबांनो....!" अश्या प्रकारचे संवाद व्हायचे.

कुटुंब त्याच ट्रकमध्ये बसून सर्वांना शेवटचा टाटा करून काळाच्या ओघात गुडुप व्हायला निघून जायचे. चाळीतील उरलेले आपापल्या आयुष्यात गर्क व्हायचे. त्या खोलीत मग एखादे नवे बिऱ्हाड यायचे. त्या खोलीचा कायापालट व्हायचा.

अशी बिऱ्हाडं येत जात राहायची. पण मूळ रहिवाश्यांशी असलेलं ते नातं परत क्वचितच तयार व्हायचं!

आजही ती माणसं मनात घर करून आहेत. अनेक वर्षांपूर्वी जाताना जशी दिसायची तीच छबी अजून मनाच्या एका कोपऱ्यात कोरलेली आहे. काळ पुढे सरकला तरी खुणा मागे ठेवून गेला आहे!

बिऱ्हाडं केव्हाच गेली असली तरी त्यांच्या आता थोड्याश्या अंधुक झालेल्या आठवणी आजही मनात "बिऱ्हाड" थाटून आहेत!


मिलिंद आरोलकर. 

Monday, 28 June 2021

पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत.




                 Photo share by facebook

पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत.

१) आळंदी - पालखी आळंदीतून (वद्य ।।९।।) निघते. आळंदी म्हणजे आत्मानंद.पालखीचा प्रारंभ आत्मानंदातून होतो. 

२) पुणे - पालखी पुण्यात येते. पालखीबरोबर निघालो की जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होऊन पुण्य प्राप्त होते. (भवानी पेठ, बुरडाच्या पुलाकडील पालखी विठोबा मंदिर, पुणे या ठिकाणी पालखीचा दोन दिवस मुक्काम असतो.)

३) दिवेघाट - नंतर पालखी संवत्सर ग्राम उर्फ सासवड* या क्षेत्राकडे निघते. सासवडला जाताना दिवेघाटातून म्हणजे  यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी  या अष्टांगयोगाच्या आचार दिव्यातून जावे लागते. 

४) सासवड - वड म्हणजे *सप्तचक्र. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा व शून्यचक्र* या सप्तचक्रांची जागृती ही जीवनाची गरज आहे व ती जागृती प्राणायामाने होते. प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण, श्वासावर ताबा म्हणजे *सासवडचा* मुक्काम व परमार्थाचा मार्ग सोपान होऊन *सोपानदेवांच्या* समाधीचे दर्शन घ्यावे.

५) जेजुरी - नंतर पालखी जेजुरीला येते. ज = जितेंद्र ,
जोरी = जास्त त्रास न घेणे.
म्हणजेच *जो जास्त त्रास न घेता इंद्रियांना जिंकतो तो आनंदी होतो.* 

६) वाल्ह्या - भर दुपारी वाल्ह्यात येते. येथे दुपारचा मुक्काम असतो. भर तारुण्यात माणसाने वाल्हे= कोमल, प्रेमळ, जिव्हाळासंपन्न* झाले पाहिजे. (वाल्ह्यात वाल्मिकी ऋषींच्या समाधीचे दर्शन होते.)

७) लोणंद - त्यानंतर पालखी लोणंदला मुक्कामाला येते. लो = देणे, आनंद = परमसुख. श्रीविठ्ठल भक्तीसाठी घरदार सोडून आलेला वारकरी भक्तिरसाने परमानंदी होतो व तो आनंद इतरांना देतो. 

८) तरडगाव - जर तू ब्रम्हानंदाचा आनंद घेतला नाहीस तर तुला जीवनात रडावे लागेल* या सिध्दांताचे चिंतन करण्यासाठी पालखी तर + रड =तरडगावला* येते. 

९) फलटण - ब्रम्हसत्यं जगन्मिथ्या। म्हणजे ब्रम्ह हे पूर्ण सत्य आहे बाकी सारे जग फोलपटासारखे मिथ्या म्हणजे टाकाऊ आहे. हा अनुभव वारकऱ्यांना फलटणला आल्यावर येतो. हे जीवनाचे सत्य समजल्यावर

१०) बरड - संसारातील सुखदुःखादि द्वद्वापासून मुक्त होतो. त्याचे जीवनरुपी क्षेत्र वासनेचे तृणांकूर न फुटणारे *बरड* जमिनीसारखे होते. 

११) नातेपुते - नातेपुते या गावी इतर नात्याचा मोहातून मुक्त होऊन तो फक्त *श्रीविठ्ठलाचा* होतो.

१२) माळशिरस - माळ = साखळी + शिरस = ज्ञान = माळशिरस. पायी चालल्याने शारीरिक मुखाने नामस्मरण केल्याने वाचिक विठ्ठलध्यासाने *मानसिक* तपाबरोबर कीर्तन - प्रवचनाच्या  श्रवणाने ज्ञानाची साखळी त्याला विठ्ठलरूप करते. 

१३) वेळापूर -त्यानंतर त्यांचा मुक्काम वेळापूरात होतो. क्षणभर सुद्धा वेळ वाया न घालविता विठ्ठलभजन केले पाहिजे हे ज्ञान होते. 

१४) वाखरी - वाखरीच्या मुक्कामी त्याची वाणी प्रासादिक व वाचासिद्ध होऊन.

१५) नंतर तो पंढरपूर जाऊन पांडुरंगमय होतो.

       🙏 "पांडुरंग... पांडुरंग "🙏



मिलिंद आरोलकर.

Monday, 14 June 2021

आठवतो का रे १३ जून चा दिवस ?


आठवतो का रे १३ जून चा दिवस ?


झिरमिर पावसात नव्या रेनकोट मध्ये आपलं जुनंच दप्तर कोंबून , चिखल तुडवत आज च्या दिवशी नव्या गणवेशात शाळेत जायचो आपण आठवतंय का ?
नवा वर्ग , नवी रांग , नवा बेंच आणि नवे मित्र आठवतंय का ?
" एक साथ नमस्ते आम्ही आपले स्वागत करतो " ह्या वाक्याने नव्या शिक्षकांचं स्वागत करायचो आपण आठवतंय का ?
नवा हजेरी पट आणि त्यावर आपलं नाव चुकून जर का आलं नाही तर वाटणारी भीती आठवते का ?
नव्या वह्या पुस्तकांचा वास आज ही नाकात तसाच आहे ,
सगळ्या वाह्यांच ब्राऊन कव्हर आणि त्यावर मारलेल्या स्तेपलर च्या पिना आठवतायत का ?
मधल्या सुट्टी त मुतारी बाहेरची रांग , हाथ धुवायची लगबग आणि नव्या डब्यातल्या जाम चपाती ची चव आठवते का ? 
वर्ग विसरून चुकून दुसऱ्याच वर्गात जाऊन बसल्यावर होणारी फजिती आठवते का ?
आपल्या वर्गाला जेव्हा मैदानावर जायला मिळायचं तेव्हा बाकीच्या वर्गातल्या पोरांना दाखवलेल्या जिभा , खेळताना फुटलेलं ढोपर आणि त्यावर डेटॉल चा कापूस लावल्यावर होणारी आग आठवते का ?
शाळा सुटताना होणारं वंदे मातरम् आणि " जय हे , जय हे " यायच्या आधीच दप्तरात अडकवलेले हाथ , उद्या लवकर ये रे अशी मित्राला घातलेली साद , मुख्याध्यापिकांनी वटारलेले डोळे आणि छडीचा मार आठवतोय का ?
.
.
काहीसा असा असायचा आपला शाळेचा पहिला दिवस आठवतंय का ?
१३ जुन ही तारीख आठवतेय का ????
जर का आठवले असतील ते दिवस तर आपल्या शाळेतल्या मित्र मैत्रीणींची आठवण करा जरा ❣️
.
.
# शाळा #


मिलिंद आरोलकर. 

तारुण्यातील मैत्री व पन्नाशी पार नंतर ची मैत्री यात बराच फरक असतो.

तारुण्यातील मैत्री व पन्नाशी पार नंतर ची मैत्री यात बराच फरक असतो. 

तारुण्यातल्या मैत्रीत खूप मजा असते, आपण तारुण्यात कोणाची कदर करत नसतो कारण तेव्हां मैत्रीचा खरा अर्थच कळलेला नसतो.... मैत्री टिकली तर टिकली नाहीतर उडत गेली. कधी आपण पुढचा विचार करत नाही व पाठीमागे वळून पण पाहात नाही. आपण आपल्या विश्वात खूप रमून जातो आणि आपलं विश्व त्या बेडकाच्या डबक्यासारखे असते. डबकं सोडून कधी विशाल सागराचा विचारच केलेला नसतो पण जेव्हां पन्नाशीला पोहचतो तेव्हां कधी डबकं सोडून सागराला मिळालेलो असतो ते कळत सुध्दा नाही...

 जेव्हा पन्नाशीच्या सागरात मित्र मैत्रिणी भेटतात तेव्हां सगळ्या नात्यात ते मैत्रीचे नाते इतकं आपलसं वाटत असते कि, ती मैत्री खूपखूप हवी हवीशी वाटत असते.

 नात्यापेक्षा मैत्रीचा आधार खूप हवासा वाटत असतो. मैत्रीत खूप मोकळेपणा असतो, त्यात भेद अजिबात नसतो. आपली विचारांची तार जर जुळत असेल तर सर्व गोष्टी पडद्या आड न ठेवता आपण मनसोक्त गप्पा - गोष्टी करतो आणि आपलं कोणी ऐकून घेतं किंवा आपल्यासाठी वेळ काढतो, आपल्याला समजावून जो घेतो, सुखादु:खात सहभागी होतो व चुकलं तर बोलतात व माफ ही करतात असे मिळालेले मित्र म्हणजे 'नवरत्ना' तल्या रत्नातले कोहिनूर हिरेच म्हटंल तर वावगे ठरणार नाही .

आपण कोणाचे कोणीच नसतो पण आपलं मात्र काहीतरी  "ऋणानुबंध "असतात म्हणूनच आपली भेट कोणत्या ना कोणत्या रुपात ही नक्कीच होते.

आत्ता आयुष्याची पन्नाशी ओलांडल्यावर पुढचे आयुष्य हे बोनस आयुष्य आहे तेव्हां या वळणावर जेवढे मित्र मैत्रिणी भेटतात त्यांना भेटूया.... 
कोणाला काय माहीत की आपला प्रवास हा कुठे पर्यंत आहे? प्रत्येकाचे स्टेशन वेगळे आहे... 

ते आले की उतरावेच लागते... 
म्हणून जो पर्यंत प्रवास आपला चालू आहे त्या प्रवासात सगळे मनातल्या तक्रारींना काढून टाकूया. माहीत नाही परत आपण कधी, कुठे आणि कसे भेटू ? म्हणून मैत्रिची ही साथ खूप आधाराची व समाधानाची वाटते हे मात्र नक्की!! 

पण अशी मैत्री समजुन घेणारे फार कमी असतात.ज्याला खरे निस्वार्थी जिवलग मित्र लाभले ते भाग्यवान....


मिलिंद आरोलकर -

Wednesday, 2 June 2021

भाड्याची सायकल

                
                🚲  भाड्याची सायकल 🚲

आज जागतिक सायकल दिन . सायकल चालवा आरोग्य सुधारा व पर्यावरणाचा समतोल साधा असा सल्ला दिला जातो. पण सुमारे चाळीस वर्षापूर्वी सायकल खरेदी करणे ही सर्वसामान्याच्यां ही आवाक्यातली बाब नव्हती त्या काळातील रंजक आठवणी ....
१९८०-९० चा काळ होता तो...
त्यावेळेस आम्ही लोकं भाड्याने छोटी सायकल घेत होतो...
बहुधा ती लाल रंगाची असायची जिला कँरीअर नसायचे, ज्यामुळे तुम्ही कुणाला डबल सिट नेऊ नये हा उद्देश असायचा. 
भाडे जेमतेम ५० पैसे ते १ रू तास च्या आसपास होतं. 
दुकानदार भाडे पहिले घ्यायचा आणि आपले नाव त्याच्या रजिस्टर वर नोंदवायचा. 
घराच्या जवळ असे अनेकजण सायकल दुकानदार होते...

 भाड्याचे नियम कडक असायचे. 
● जसे पंच्चर झाली तर त्याचे वेगळे पैसे, तुटफुट आपली जबाबदारी... 
मग त्या सायकल वर आम्ही गल्लीतले युवराज सवार व्हायचो 
पुर्ण ताकदीने पायडल मारत , कधी हात सोडत बँलेंस करत , कधी खाली पडुन पुन्हा उठून चालवायचो. 
आपल्या गल्लीत येऊन सर्व मित्र आळीपाळीने सायकल चालवायला मागायचे.  
भाड्याच्या टाईमाचा लिमिट निघुन न जावा म्हणून तीन चार वेळेस त्या दुकानापासुन चक्कर व्हायची... 

तेव्हा भाड्याने सायकल घेणं , हे आमच्या श्रीमंतीचे लक्षण होतं... 
स्वतः ची लहान सायकल असणारे त्यावेळेस खुप रईसी झाडायचे... 

एव्हाना आमच्या घरी तेव्हा मोठी काळी अँटलस सायकल आणली , 
पण तिला स्टँडवरुन काढणं आणि लावणं 
यातचं अर्धी एनर्जी वाया जायची
 आणि वरुन वडिलधाऱ्याचा धाक...
खबरदार हात लाऊ नको सायकलला , गुडगे फुटुन येशील...
तरी पण न जुमानता आम्ही घरचे बाहेर गेले की , ती मोठी सायकल सुध्दा हातात घेऊन धुम ठोकायचो... 
पायडल वर पाय ठेऊन बँलेंस करायचं...
असं करत करत आम्ही कैची ( हाफींग ) शिकलो. 
नंतर नळी पार (फुल पायडल ) करुन नविन विक्रम घडवला.. 
यानंतर सिट पर्यंत चा प्रवास एक नवीन अध्याय होता , 
नंतर सिंगल, डबल, हात सोडुन, कँरीअर वर बसुन चालवण्याचे सर्व स्टंट आम्ही तेव्हाच करुन चुकलो... 

खरं तर जीवनाची सायकल अजुनही चालु आहे 
पण आता ते दिवस नाही...
तो आनंद नाही....  

आज सहज कंपाउंड मध्ये धुळ खात पडलेल्या मुलांच्या सायकल वर नजर गेली तेव्हा वाटलं एक काळ गाजवलेल्या सायकलची किंमत अन् मजा यांची सर 
आता असलेल्या चार चाकी वा दुचाकी ला पण येणार नाही...

गेले ते दिवस...
राहिल्या त्या आठवणी...... 
असा काळ आपल्यापैकी बऱ्याच जणांनी उपभोगला असेल .


मिलिंद आरोलकर.

मुंबईतला गिरणी कामगार

गिरणी कामगार मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. कधी काळी मोठ्या प्रमाणात असलेल्या कापड गिरण्यांच्या बळावरच मुंबईला ही ओळख मिळाली. गिरणीचा भोंगा...