Sunday 27 January 2019

शाळा - महाविद्यालयातील स्नेहसंमेलनाचा घसरता दर्जा.

दरवर्षी जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात  महाविद्यालयात स्नेहसंमेलने होतात.काही महाविद्यायालयांनी स्नेहसंमेलन म्हणजे नुसती " उठाठेव नि डोकेदुखी " बंद केली आहेत. त्यांनी खर म्हणजे अशा संस्कृती- उध्दारक कार्यक्षम शाळा - महाविद्यालयांचा आदर्श घ्यायला हवा , निदान कानठळ्या बसविणाऱ्या  ह्दयविकाराचा तीव्र झटका आणणाऱ्या , गर्भातल्या बाळालाही घाबरवून सोडणाऱ्या  डीजे चे कार्यक्रम वारंवार घ्यावेत . म्हणजे अकारण ज्ञान , विज्ञान , शिस्त , संस्कार आणि सुप्त कलागुणांना वाव  सांस्कृतिक उपक्रम असल्या अनाठायी गप्पानां पूर्णविराम मिळेल.नाही तर अशा धांगडधिंगाणा छाप कार्यक्रमांना वाव कुठे मिळतो ? विद्यापीठ पातळीवर होणाऱ्या सांस्कृतिक स्पपर्धामध्ये एकांकिका , एकपात्री प्रयोग , सुगम संगीत ,चित्रकला,कोलाज यासारखे ज्याला साधना लागते असेच कार्यक्रम  आणि स्पर्धा असतात.
पूर्वी स्नेहसंमेलने व्हायची,त्यामध्ये तर प्राध्यापकांच्या पुढाकाराने तीन अंकी नाटक महिना महिना तलीम  घेऊन  बसविले जायचे.
त्यात रंगभूमीला स्टेजवरचे  आणि बँकस्टेजचे कलाकार निर्माण करण्याची क्षमता असायची.रंगभूमीची शिस्तही अशा मुलामुलींच्या अंगी बाणावली  जायची .आपल्याला स्नेहसंमेलनाच्या  एकांकिकेत  एखादा रोल मिळावा , म्हणून महाविद्यालयात होणाऱ्या  निवडचाचणीसाठीही जय्यत तयारी व्हायची. एकपात्री , सुगम संगीत गायन , नाट्यसंगीत  अशा विविध गुणांचे दर्शन संमेलनामध्ये असायचे. त्याकलेबाबत  मार्गदर्शन , अभ्यास , आणि कष्टपूर्वक तयारी हे  अपरिहार्यच असे. स्नेहसंमेलन आणि पारितोषिक  वितरण सोहळा म्हणजे मर्मबंधातल्या आठवणींचा खजिना असे . काळाच्या ओघात हे सगळे कुठे लुप्त झाले,कळलेच नाही. आता विचारवंत नको , प्रमुख अतिथी म्हणून  लोकप्रिय अभिनेता वा अभिनेत्री हवी असते. सगळ्या उपक्रमांचे कधी बारा वाजले ,हे लक्षातच आले नाही.
फारसे शास्त्रीय अधिष्ठान नसलेली उठवळ गाणी मोठ्या आवाजात वाजवायची. त्यावर स्टेज हादरवून सोडणारी नूत्ये करायची त्याला नूत्य म्हणता तरी येईल का  हा प्रश्न पडतो. असतात ते आचकट विचकट चाळे  आणि लोकांना कर्णबधीर करुन सोडायचे . अशा कार्यक्रमांच्या सादरीकरणात कला अजिबात अंगी नसते , एखाददुसरे नूत्य  खरेच चित्रपटातील नूत्याहूनही सुंदर असू शकते . पण सरसकट पाहिले तर  सावळागोंधळ नि धांगडधिंगाणा  यासदरात मोडणारा  सगळा प्रकार असतो. निदान ज्याला सूजनाची आणि साधनेची गरज एकाग्रता व कष्टाचे मोल द्यावे लागते असे  काही सादर होताना अलिकडे दिसत नाही. म्हणजे  " ती फुलराणी " किंवा " प्रेमा तुझा रंग कसा ? " यातील १० मिनिटांचा प्रवेश सादर करायचा तर उच्चारण ,पाठांतर ,वाचिक ,कायिक अभिनय ,आवाजातले आरोह - अवरोह  ( चढ-उतार ) ,प्रेक्षकांना खिळवून ठेविल अशी नजर आणि मुद्राभिनय  हे सगळे आले .त्यापेक्षा " झिंग झिंग झिंगाट "  हे मोठया आवाजात लावायचे . नि एकानेच काय  १०/२० जणांनी स्टेजतोड नाच करायचा हे कसे सोपे आहे ,छान आहे  आनंद  म्हणावा तर तो गाण्यातला आहे ,चमचमणाऱ्या रंगीबेरंगी प्रकाशझोतांचा , प्रकाशरेषांचा आहे ,थोडाफार नाचातला ही आहे  सारे कसे झिंग आणणारे  असते ,कसली मज्जा असते,जल्लोष असतो. ते ज्या आमच्यासारख्या अरसिकांना  आवडत नाही , ते ओरडत असतात. स्नेहसंमेलनातला स्नेह संपला ,विविध गुणदर्शनातले गुणदर्शन संपले,गुण उधळण राहिली . पण अशा मतांना कस्पटासमान लेखले पाहिजे.
अलिकडे शाळांच्या स्नेहसंमेलनातसुध्दा ९/१० वर्षाच्या चिमुकल्या मुली " अप्सरा आली " किंवा  "चोली के पिछे क्या है "  अशा गाण्यावर नाचवले जाते आईवडिलांना त्याचे किती कौतुक चार शब्द बोलता  नाही आले स्टेजवर तरी चालेल .पण गाण्यावर नाचता आले पाहिजे .ही मुलंमुली त्यालाच कलागुण समजत राहतात , आणि त्याच्या सूजनाच्या आणि साधनेच्या वाटाच बंद होतात. शाळांमध्ये तरी  कलागुणांचे विकसन व्हावे असे उपक्रम व्हावेत कि नाही ? त्यासाठी वेळच नाही. गाणी वाजवायला वेळ लागत नाही ,गाण शिकायला वेळ लागतो . तरुण मंडळे ,राजकीय पक्ष संघटना इत्यादीसुध्दा धार्मिक झिंग आणणारे उपक्रम  आणि रेकॉर्ड डान्स  स्पर्धा चेच  आयोजन करतात. नाहीतर माणसं गोळा कशी होणार.
हल्ली प्रोफेशनल काँलेजेसमध्ये वेलकम् , फेअरवेल असले कार्यक्रम अधूनमधून होत असतात. भरमसाठ वर्गणी वसूल करुन खानपान ,नूत्यधिंगाणा यात रात्र जागविणाऱ्या कार्यक्रमाची तयारी त्यात असते . अगदी महाविद्यालयातील टँँडिशनल डेज् मध्ये सुध्दा डीजेच्या  जोडीला  मद्य ही  आले ,ही गोष्ट आता सर्वश्रुत झाली आहे.सर्वच चांगल्या  उपक्रमाचे " वाजले कि बारा " म्हणायचे फक्त ,की भडक नि भव्य धिंगाणाग्रस्त  उपक्रमांना हद्दपार करून छोटे पण कलासक्ती वूध्दींगत करणारे  कार्यक्रम घ्यायचे ,हे अजूनही शाळा - महाविद्यालय यांच्या हातात आहे .त्यासाठी फक्त इच्छाशक्ती हवी !



मिलिंद आरोलकर.

Sunday 6 January 2019

बेपर्वाईचे बळी..!

मुंबई  शहर व आसपासच्या परीसरात गेल्या काही वर्षापासून विस्तारिकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक मोठे रस्ते शहरातून जातात,महत्वाचे राष्ट्रीय व राज्य महामार्ग यांस अनेक रस्ते  येऊन मिळतात.शहरातील अरूंद रस्ते  काही ठिकाणी चाललेल त्याच विस्तारीकरणाचे काम होत असतानाच  अपघातांची संख्या वाढत चालली आहे. वाढलेल्या वाहनांची संख्या मोठी असून ,गेल्या वर्षभरात  झालेल्या अपघातात विद्यार्थी व तरुणांचा  झालेला मूत्यू हा चिंतेचा विषय ठरला आहे . मुलांच्या हाती वाहन म्हणजे मूत्यूची चावीच झाली असून ,त्याचा कुटुंब व समाज व्यवस्थेवर गंभीर परीणाम होत आहे.  शहरातील रस्त्याच्या बाजूस गूहनिर्माण संस्था, व्यावसायिक इमारती  व शैक्षणिक संकुलही मोठ्या प्रमाणावर आहेत . शहरात व शहराबाहेर असलेल्या व्यावसायिक शिक्षण संकुलात जाणाऱ्या विद्यार्थी -विद्यार्थीनीचीं संख्या लक्षणीय असून ,हे विद्यार्थी सार्वजनिक वाहनांचा वापर करण्यापेक्षा मोटारसायकलने ये-जा करताना  दिसतात. पालकही मुलांचा येण्याजाण्याचा त्रास  व वेळ वाचावा   या उद्देशाने मोटारसायकल वा अन्य  वाहन घेऊन देतात.मात्र,मुलांकडे हे मोटारसायकल चालविण्याची क्षमता आहे की नाही हे तितकेसे पाहत नाही त. याबाबत पालकही बेफिकीर असून ,आपला मुलगा किंवा मुलगी  वाहन कसे चालवितात याकडे पहायला व विचारायलाही त्यांच्याकडे वेळ नाही.
अनेक मुले व तरुण  पालकांना  चुकवून वाहने घेऊन जातात.नियम व गतीची माहिती नसतानाही शहरात  शहराबाहेर सुसाट वेगाने वाहने चालवितात.त्यामुळे पहाणाऱ्याच्या मनात ही अपघाताची धडकी भरते. मुंबई  महाराष्ट्रातील लहान मोठ्या शहरातील तरुण वर्ग  महाविद्यालयात जाताना सर्रास वापरत असल्याचे पहावयास मिळते. विद्याथ्र्यांनी गाडी वापरण्यास दुमत नाही , परंतु वापरताना,चालविताना जी बेफिकिरी पाहवयास मिळते ती मात्र काळजी करणारी आहे. त्यामुळे मोटारसायकल चालविणाऱ्या  विद्यार्थ्यात जागृती  करण्याची आज गरज बनली आहे.
देशात दरवर्षी रस्ते अपघातात दीड लाखांहून अधिक माणसे मूत्यूमुखी पडत असून , यात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे.या अपघातांमुळे अनेक कुटुंबे उघडी पडत आहेत .शहरात वाहतुकीचे नियम न पाळता अल्पवयीध मुले,विद्यार्थी-विद्यार्थीनी  राजरोसपणे मोटारसायकल चालविताना दिसतात. धूमस्टाईल हायस्पीड चालविण्याची रस्त्यावर जणू स्पर्धाच लागलेली असते.अनेक शाळा महाविद्यालयाच्या  परिसरामध्ये विद्यार्थी-विद्यार्थीनी विनापरवाना  वाहने चालवित आहेत. अशा अल्पवयीन मुलांमुळे बेदरकार वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांमुळे त्यांचा जीव धोक्यात असतोच , मात्र त्यासोबत अन्य वाहनधारक व पादचाऱ्यांनाही  धोका निर्माण होतो , अशा घटनांना आळा घालण्यासाठी  वाहनचालकांवर केवळ दंडात्मक  शिक्षा न करता  गाडीमालक व पालकांवर  कारवाई झाल्यास जरब बसविता येईल . विनापरवाना व विद्यार्थ्यानीं चालविलेल्या वाहनांच्या धडकेत अनेक मूत्यू पावल्याचे व कायमचे अपंगत्व आल्याच्याही घटना पहावयास मिळतात. त्यामुळे वाहन अपघात हा सध्या गंभीर चिंतेचा  विषय झाला आहे. त्यामुळे मुलांना विद्यार्थ्यांना मोटारसायकली देण्याचे  टाळून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करण्यास पालकांनी प्रवूत्त करण्याची अपेक्षा आहे. धूमस्टाईल हायसहायस्पीडने मोटारसायकल चालवणाऱ्या विद्यार्थी व तरुणांवर आता कडक बंधने घालणे गरजेचे आहे. अन्यथा कुटूंबचा आधार नाहीसा होईल.


मिलिंद आरोलकर.

२३ एप्रिल: आज जागतिक पुस्तक दिन

२३ एप्रिल: आज जागतिक पुस्तक दिन २३ एप्रिल: आज जागतिक पुस्तक दिन. संपूर्ण जगभरात २३ एप्रिल रोजी 'जागतिक पुस्तक दिन' साजरा...