Sunday 30 May 2021

चल मेरी लूना




                         चल मेरी लूना


ज्याकाळी पुणे ते मुंबई अंतर पार करायला बाकीच्या रेल्वे गाड्यांना ५ तास लागत हेच अंतर डेक्कन क्वीन पावणे तीन तासात पार करत असे.
१ जून १९३० साली सुरु झालेल्या डेक्कनक्वीन कधीच वाफेच्या इंजिनवर चालली नाही. पहिल्या दिवसापासून इलेक्ट्रिक इंजिनावर चालणारी पहिली प्रवासी गाडी, भारतातील पहिली डिलक्स गाडी, पहिली सुपरफास्ट गाडी, एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्याची सोय असणारी पहिली गाडी, महिलांचा व खानपान सेवेचा स्वतंत्र डबा असणारीही ही पहिलीच गाडी.

डेक्कन क्वीनच्या नावावर असे पहिले पणाचे अनेक विक्रम नोंद आहेत. भारतातील मानाची गाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेक्कन क्वीनच्या नावे आणखी एक विचित्र विक्रम आहे.

 
“लुना कडून हरण्याचा विक्रम”

लुना कोणाला माहित नाही? पुणेकर (मुळचे अहमदनगर चे) फिरोदियांच्या कायनेटिक ग्रुप कंपनीने जपानच्या होंडाच्या सहकार्याने लुनाची निर्मिती केली होती. इटालीयन प्याजिओच्या चिआओ नावाच्या गाडीची ही लायसन्स कॉपी होती.

१९७२ साली ही गाडी लॉंच झाली आणि आल्या आल्या भारतभरात या गाडीची हवा सुरू झाली.

 
वजनाला अगदी हलकी, छोटी सुटसुटीत बाईक सायकलला एक उत्तम पर्याय होती. पुण्यासारख्या सायकलींच्या शहरात तयार होणाऱ्या लुनाने झटक्यात मार्केट मारले. कित्येकांनी ही गाडी बुक केली.

सुरवातीला अनेकांना शंका होती की,

भारतात अनेक ठिकाणी रस्ते कच्चे आहेत तर ही गाडी तिथे कशी टिकेल? लुनाला स्पीड असणार की नाही?

यासाठी फिरोदियानी लुनाची पब्लिसिटी करण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया वापरल्या.
टीव्ही वर्तमानपत्रात याच्या जाहिराती झळकू लागल्या. तरुणांना आकर्षित करण्यासाठी क्रिकेटच्या सामन्यावेळी मॅन ऑफ द मॅच म्हणून ही लुना बक्षीस दिली जाऊ लागली. 

फोर्स मोटर्सचे चेअरमन अरुण फिरोदिया यांना आठवते त्या प्रमाणे फेमस क्रिकेटर संदीप पाटील, चंद्रशेखर यांनी ही लुना जिंकली होती. दहावी बारावीच्या बोर्डात नंबर काढणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील लुना बक्षीस दिली जायची.

यापेक्षाही वरताण म्हणजे लुनाच्या वेगाची खात्री सगळ्यांना पटावी म्हणून थेट डेक्कन क्वीन एक्प्रेसबरोबर तिची रेस लावणार असल्याच जाहीर केलं.

अनेकांना गंमत वाटली. ५० सीसी ची ही छोटीशी मोपेड भारतातल्या सुपरफास्ट ट्रेनशी कशी काय स्पर्धा करू शकते? हा फक्त पब्लिसिटी स्टंट आहे असा अनेकांना गैरसमज झाला. पण अरुण फिरोदिया सिरीयस होते. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषद सभापती जयंतराव टिळक यांच्या हस्ते पुणे स्टेशनवरून शर्यतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला व दादरला शर्यत संपणार तिथे मुंबईचे पोलीस कमिशनर यांना स्पर्धेचा विजेता घोषित करण्यासाठी परीक्षण करण्याची विनंती केली.

 
सकाळी ठीक ७.२० वाजता नेहमीच्या टायमिंगला डेक्कन क्वीन पुणे स्टेशन वरून सुटली.
त्याचवेळी जयंतराव टिळक यांनी हजारोंचा जमाव व पत्रकारांच्या साक्षीने लुनाला देखील हिरवा झेंडा दाखवला. 

लुनास्वाराने जीव तोडून गाडी हाकली. तेव्हा मुंबई पुणे जुना महामार्ग होता. आज आपण पाहतो तो एक्स्प्रेसवे अजून अस्तित्वात यायचा होता. खंडाळ्याचा प्रचंड मोठा घाट तिथला वळणावळणाचा रस्ता अशी अनेक आव्हाने लुना समोर होती. अनेकांनी पैज लावली होती की लुना लोणावळ्याच्या देखील पुढे जाऊ शकणार नाही.

 
पण या साऱ्यांचा अपेक्षाभंग करून लुनाने आपल्या स्टाईलमध्ये घाटरस्ता पार केला.
अरुण फिरोदिया सांगतात की वाटेत इमर्जन्सी साठी मदत म्हणून आम्ही एक कार देखील लुनाच्या पाठोपाठ पाठवली होती. मात्र लुना एवढ्या सुसाट सुटली होती की कारला देखील तिला गाठणे अशक्य होत होतं.

 
लुनाने जेव्हा मुंबईत प्रवेश केला तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण फिरोदिया यांना लुना ही शर्यत पूर्ण करेल याची खात्री होती पण ती तब्बल १५ मिनिट लवकर दादर मध्ये दाखल होऊन सर्व शक्तिमान डेक्कन क्वीनला हरवेल हे खुद्द त्यांनी स्वप्नात देखील पाहिलं नव्हत.

पण हे खरोखर घडल. टाळ्यांच्या गजरात लुना डेक्कन क्वींनच्या आधी दादर स्टेशनला पोहचली.
तिला गाठायला डेक्कन क्वीनला १५ ते २० मिनिट लागले. ५० सीसी ची मोपेड लुना जिंकली होती. मुंबईत वार्ताहर हा सोहळा बघण्यासाठी हजर होते. दुसऱ्या दिवशी प्रत्येक वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर लुनाचीच चर्चा होती.

त्यानंतर ‘चल मेरी लुना’ च्या आडव येण्याची हिंमत कोणाची उरली नाही.



मिलिंद आरोलकर.

Thursday 27 May 2021

उंबरा




                        उंबरा



उंबरा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसविलेले जाड, रुंद आणि सपाट लाकूड. दाह शमन करणारा आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून रहाणारा वृक्ष म्हणजे उंबराचा वृक्ष. 

म्हणूनच पूर्वीच्या काळात घराचा उंबरा हा उंबराच्या खोडापासून बनत असे.

या वृक्षाच्या नावावरुनच दाराच्या चौकटीत बसवायच्या या लाकडाचं नाव उंबरा असे पडले असावे. 

उंबराचा वृक्ष हा कृतिका नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे आणि त्याच्या औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झालेले आहे.

घरात शिरताना शुभ वृक्षाच्या लाकडाला ओलांडून प्रवेश केल्यास घरातील उर्जा कायम सकारात्मक राहिल, या हेतूने उंबराच्या वृक्षाचा वापर होत असावा, असाही कयास करता येईल. 

काही लोक याच "उंब-याला उंबरठा "असेही म्हणतात. उंब-यापाशी उभं राहून आपण येणा-या व्यक्तीची वाट बघतो. उंबरा ओलांडून एखाद्या भिक्षेक-याच्या झोळीत भिक्षा टाकतो. 

नववधू घराच्या उंबरठ्यावर ठेवलेले माप लांघत घरात प्रवेशते. 

उंब-याला गृहित धरत आपण बरेचसे शुभ अशुभ संकेत मानतो. घरातल्या उंब-याच्या खूप सा-या भूमिका असल्या तरीही माझ्या मते उंबरा असते एक मर्यादा. 

उंबरा असते एक सीमारेषा.
उंबरा म्हणजे आपल्याला भानावर आणणारी नेमकी गोष्ट.

बाहेरुन घरात येणा-यांसाठी आपला इगो चपलांच्या सोबत बाहेर काढून ठेवायची जागा म्हणजे उंबरा. प्रवेशत असलेल्या घरातल्या चालीरीतींना मान देत आपण वागायचं आहे हे उंब-याची वेस ओलांडतानाच मनात बिंबवून यायचं असतं. आणि घरातून बाहेर पडत असताना त्या घराने आपल्यावर केलेले संस्कार बाहेर पडल्यावरही आपण विसरणार नाही, हे आपल्या लक्षात आणून देणारी जागा म्हणजे उंबरा. 

उंबरा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारं स्थान.

उंब-याबाहेर पडल्याशिवाय जग काय आहे हे कळत नाही हे म्हणतात ते अगदी खरं आहे. 

उंबरठे झिजवल्या शिवाय यश पदरात पडत नाही हे सुद्धा खरंच.

पण 

उंबरठे झिजवताना आपल्यावर आपल्या उंब-याने केलेले संस्कार लक्षात ठेवले तर निसरड्या जागांचा सामना करणं सोपं होत असतं.

अजून एक गोष्ट इथे नमूद करायलच हवी. ती म्हणजे - उंब-याच्या बाहेर पडण्यासाठी फार मोठं धैर्य लागतं आणि बाहेरच्या जगात वावरण्यासाठी मर्यादेचं फार मोठं भान. हे भान जे कोणी जपतं त्याचं आयुष्यात नेहमीच सुंदर होत असतं.,......



मिलिंद आरोलकर

Tuesday 25 May 2021

उत्तराखंडमधील गणरायाचे मुंडकातीय मंदिर कोठे आहे? असे मंदिर जिथे गणपतीची मस्तक नसलेली मूर्तीची पूजा केली जाते.



उत्तराखंडमधील गणरायाचे मुंडकातीय मंदिर कोठे आहे? असे मंदिर जिथे गणपतीची मस्तक नसलेली मूर्तीची पूजा केली जाते.


 तुम्ही असे कोणतेही मंदिर ऐकले आहे की जेथे मस्तक न घेता गणपतीची पूजा केली जाते? होय, आपण हे ऐकलेच आहे! असे एक मंदिर आहे जेथे अनुयायी त्याच्या शीरविरहित गणेशची उपासना करत आहेत. आज मी तुम्हाला गणपतीच्या मुंडकातीय मंदिराबद्दल सांगत आहे, संपूर्ण माहितीसाठी शेवटपर्यंत वाचा.   

 

                  मुंडाकट्या मंदिर

 हे केदार खोऱ्यातील , मुंडाकट्या मंदिरात आहे. हे जगातील एकमेव असे मंदिर आहे जिथे डोक्याशिवाय गणपतीची पूजा केली जाते. उत्तराखंड राज्यातील गढवाल विभागातील चमोली जिल्ह्यातील सोनप्रयागपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर हे मंदिर देवभूमी म्हणूनही ओळखले जाते.


 शिवपुराणानुसार, भगवान शिवशंकर आपले वडील आहेत याची जाणीव नसल्यामुळेच गणपतीने आपल्या वडिलांना पार्वतीदेवीच्या खोलीत प्रवेश करण्यापासून रोखले होते.


 आणि ही ती जागा आहे जिथे गणपतीच्या धड्यावर हत्तीचे डोके ठेवले होते. मंदिराचे नाव कसे ठेवले गेले? मुंडाकटिया हे नाव मुंडा (डोके) आणि कातिया (विच्छिन्न) या दोन शब्दाचे संयोजन आहे जेव्हा मंदिराला मुंडकटिया मंदिर असे नाव दिले गेले.

 शिव पुराणानुसार पार्वती देवी स्नानासाठी गेल्या. त्यावेळी त्यांनी अंगावरील मळ व हळदीच्या मिश्रणातून मानवी रूप तयार केले आणि त्या शरीरात आपल्या तपोसामर्थ्याव्दारे प्राण उत्पन्न केले ., तेव्हा पार्वती देवीने त्यांना आपला मुलगा म्हणून स्वीकारले आणि आपल्या खोलीत कोणाकडेही न येण्याचे आदेश दिले.
 
 मग गणपतीने द्वार पहारा करायला सुरवात केली आणि त्यानंतर भगवान शिव शंकर तेथे पोहोचले आणि गणेशाला खोलीच्या आत जाण्यासाठी निघण्यास सांगितले. पण जेव्हा त्यांनी जाण्यास नकार दिला, तेव्हा भगवान शिव रागावले आणि त्यांनी गणेशाचे डोके कापले. नंतर भगवान पार्वती जींनी गणेश जीवनाच्या आग्रहाखातर भगवान शिवने हत्तीचे डोके भगवान गणेशाच्या धड वर ठेवले आणि नंतर भगवान शिवने स्वतः त्यांना जीवन दिले आणि त्यांना आशीर्वाद दिला.


 केदारनाथला जुन्या मार्गावर केदारनाथला जाणारे भक्त इथेच प्रार्थना करण्यासाठी पूर्वी थांबत असत. परंतु आता नवीन मार्ग परिचित असल्याने यामार्गाने जाणारे भक्त फार कमी झालेत., केदार खोऱ्याच्या जंगलाच्या कुशीत असलेल्या या पुरातन मंदिराच्या खालून मंदाकिनी नदी वाहते, हे अतिशय सुंदर विहंगम असे दृश्य पहावयास मिळते .




मिलिंद आरोलकर

Monday 17 May 2021

श्री देव वेतोबा , आरवली , वेंगुर्ला -जिल्हा सिंधुदुर्ग.




   ।। ॐ नमः पराय शिवात्मने वेतालाय नमः ।।

💐 वैशाख शुक्ल पंचमी दिवस श्री देव वेतोबा ह्यांचा जन्मदिवस म्हणून आदराने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो 💐

श्री देव वेतोबा आरवली :-
आरवली येथील श्री वेतोबाचे मंदिर हे मूलत: वेताळाचे मंदिर आहे. आपल्याकडे ‘बा’ हा शब्द आदरार्थी वापरला जातो. तसेच जपानमध्ये सुद्धा ‘बा’ हा शब्द आदरार्थी वापरला जातो. गुजरातमध्ये आईला ‘बा’ म्हणण्याची पद्धत आहे. त्याचप्रमाणे वेताळ या शब्दातील ‘ळ’ हा शब्द जाऊन आदरार्थी ‘बा’ हा शब्द आला व त्यामुळे आरवलीतील हे देवस्थान ‘श्री वेतोबा’ या नावाने रूढ झाले.
वेताळ या शब्दातील महात्म्यसुद्धा अर्थपूर्ण आहे. या शब्दातील पहिले अक्षर वेगळे काढले तर उरतो ‘ताळ’, दुसरे अक्षर वेगळे काढले तर उरतो ‘वेळ’, तिसरे अक्षर बाजूला काढले तर उरतो ‘वेता’, ‘वेता’ म्हणजे वेत व अर्थातच वेताने वेळेवर ताळ्यावर आणणारी शक्ती म्हणजे वेताळ. या वेताळामध्ये भूताखेतांना व अपप्रवृत्तींच्या शक्तींना विरोध करण्याची शक्ती असते. या शक्तीचे स्वरूप अत्यंत प्रभावी परिवर्तनशील असते. यामुळेच आरवलीतील या देवस्थानची ख्याती सर्वदूर पसरली आहे.

दीड ते दोन फूट लांबीच्या चपला पायात सरकवल्या जातात आणि वेतोबा नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडतो. त्याच्यासमोर सा -या शक्ती नतमस्तक होतात. काळी शक्तीही त्याच्या समोर टिकाव धरू शकत नाही. ज्या-ज्या वेळी संकटांचे तांडव सुरू होते. तेव्हा वेतोबाचे नुसते स्मरण करावे. म्हणजे संकटे आपला मार्ग मोकळा करतात. वेतोबा सातत्याने भ्रमंती करतच असतो. त्यामुळे चप्पल झिजतात अशी धारणा आहे आणि त्यांच्या श्रद्धेला वेतोबा कसूरही ठेवत नाही असे म्हणतात, भक्तांच्या रक्षणासाठी वेतोबा सातत्याने भ्रमंती करतच असतो. तो भक्तांची काळजी घेतो. म्हणून भक्त त्याचा त्रास हलका करण्यासाठी त्याच्या पायात चपला सरकवतात. आरवली वेतोबाकडे गेल्यावर लाखो चपलांच्या जोडांचा ढीग दिसतो. केळयाचे घड लक्ष वेधून घेतात. कोकणातल्या श्रद्धेचा आणि निसर्गप्रेरणेचे हे एक भक्कम श्रद्धास्थान आहे.

विजयनगरच्या हिंदू साम्राज्यात ‘हरवल्ली’ नावाने अस्तित्वात असलेले गावाचे नाव कालौघात बदलून आरवली झाले. ‘हर’ म्हणजे ‘शिव’ व ‘वल्ली’ या शब्दाचा अर्थ ‘वस्ती’. पूर्वी या क्षेत्राच्या आसपास सोमेश्वर, सिद्धेश्वर, कोकणेश्वर इ. शंकराच्या मंदिरांची मालिका असावी, असे जाणकार सांगतात. हे वेंगुर्ले तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून शिरोडा-टांक हम रस्त्यावर वसले आहे.
रस्त्यावरून मुख्य द्वारातून डोकावले असता देव वेतोबाच्या भव्य मूर्तीचे दर्शन घडते. पूर्वी देव वेतोबाची मूर्ती फणसाच्या लाकडाची होती. दर १०० वर्षाने मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापणा केली जायची. यानंतर अलीकडेच १९९६ मध्ये भक्तांच्या सहाय्याने वेतोबाची पंचधातूपासून बनविलेली मूर्ती स्थानापन्न करण्यात आली. हातामध्ये तलवार घेऊ न उभा असलेल्या या देव वेतोबाचे वार्षिक उत्सव मोठया दिमाखात व धार्मिक वातावरणात साजरे होतात.

पूर्वी वेतोबाला फणसाचे झाड वापरले जायचे. यामुळे जेथे फणस असायचा ते स्थान वेतोबाचे असे समजले जायचे. आरवलीतील अनेक ग्रामस्थ वेतोबाकडे तातडीने जाता येत नसेल आणि त्याचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा झाली तर कुठच्याही फणसाच्या झाडाखाली उभे राहतात आणि आपली इच्छा व्यक्त करतात. फणसाच्या झाडासमोर बोललेली कोणतीही इच्छा वेतोबा समोर पोहोचते अशी त्यांची श्रद्धा आहे.

पंचक्रोशीत फणसाच्या झाडावर कुणीही शस्त्र चालवत नाही. या परिसरात फणसाचे अभयारण्यच म्हणायला हवे. कारण जेथे फणस असतो तेथे वेतोबाचा अंश समजून त्याची जपणूक केली जाते. निसर्गत: झाड तुटले तर बाजूला केले जाते. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे झाड तोडणे गरजेचेच असेल तर वेतोबाला साकडे घातले जाते. त्याच्याकडून कौलप्रसाद घेतला जातो. नंतरच सन्मानाने झाड तोडले जाते. तरीही फणसाच्या झाडाचे कोणतेही फर्निचर वापरताना आरवली पंचक्रोशीतील बांधव दक्षता घेतात.

बैठकीचे पाट अथवा घराचा दरवाजा फणसाच्या झाडापासून केला जाऊ नये, असा अलिखित नियम पाळला जातो. या भागातील बांधव जगाच्या कुठच्याही कानाकोप -यात असले तरी फणसाच्या झाडाची पूजाअर्चा करतात. अशा झाडासमोर उभे राहून वेतोबाला साकडे घालतात. काही मंडळींनी अनवधानाने फणसाच्या झाडाचा गैरवापर केला. मात्र त्यांना त्रास झाल्याने पुन्हा अशी चूक करण्याचे धाडस करत नाही.

वेतोबाला भक्तगण पादत्राणांचा नवस बोलतात, तसा केळीच्या घडाचा नवस बोलला जातो. त्याची जत्रा तर ‘केळीच्या घडांची’ जत्रा अशी संबोधली जाते. कुठच्याही हंगामात वेतोबाच्या मंदिरात पोहोचावे आणि केळी मिळत नाहीत असे कधी होत नाही. त्याशिवाय साखर, पेढे, लाडू वगैरे गोड जिन्नस, धोतरजोडी, उपरणी, पुतळी आदी नवसही बोलला जातो. मार्गशीर्ष महिन्यात होणा -या या देवाचा वार्षिक जत्रोत्सवास भक्तांची गर्दी असते.

देवाचे मंदिर शके १५८२ (इ.स. १६६०)मध्ये बांधल्याचा दाखला सापडतो. या देवळाचा सर्व मंडप सुमारे इ.स. १८९२ ते १९०० या दरम्यान बांधला गेला असावा असा जाणकार मंडळींचा अंदाज आहे. श्रीदेव वेतोबाच्या मूर्तीस सालई झाडाच्या पानाचे ३३ प्रसाद (कौल) लावण्याची वहिवाट आहे. पीडित भक्तगण आपल्या समस्या सोडविण्यासाठी व नवीन कार्यारंभ करण्याच्या वेळी देवाचा कौल लावण्यासाठी मोठया संख्येने वेतोबाच्या दरबारात पोहोचतात.

वेतोबाच्या भल्या मोठया पादुकांचे सर्वच भक्तांना आश्चर्य वाटते. सुमारे २०० वर्षापूर्वीपासूनची पादत्राणे पाहायला मिळतात. काचेच्या पेटीमध्ये ठेवण्यात आलेली ही पादत्राणे पाहताना भक्तगण हरखून जातो.

वेतोबाच्या सिंहासनासमोरील डाव्या हाताच्या खिडकीकडे या पादत्राणांचा खच पडलेला असतो. यातली हवी ती पादत्राणे तो उचलतो आणि आपल्या चतु:सीमेतील भक्ताचे रक्षण करण्यासाठी अदृष्य रूपाने फिरत असतो, अशी भक्तांची श्रद्धा आहे. याची प्रचिती देवाला वाहिलेली नवीन पादुका काही दिवसानंतर तळाखालच्या भागाने झिजल्याचे स्पष्ट दिसते. ही पादत्राणे याच गावातील चव्हाण परिवार पिढयान् पिढया करत आहे. वेतोबाच्या पादत्राणांसाठी सुचिर्भूत होऊन पवित्र मनाने बैठक मांडली जाते. दीड ते दोन दिवसात पादत्राणे तयार होतात. ही पादत्राणे विशिष्ट जागेवर ठेवली जातात.

या जागेवरून वेतोबा आपल्याला हवा तो जोड उचलतो. वेतोबाच्या प्रांगणात पादुकांचा खच पडलेला असतो. मग जुनी पादत्राणे आरवलीच्या डोंगर भागात विशिष्ट ठिकाणी जाऊन मंत्रोच्चाराने जमिनीत पुरली जातात. अलीकडे वेतोबाच्या चांदीच्या पादुका तयार करण्यात आल्या आहेत.
मंदिर परिसरातून फूल आणि अंगा -याशिवाय भक्तांना कोणतीही वस्तू दिली जात नाही. काही भक्त मंडळींनी वेतोबाच्या स्मृती जपण्यासाठी पादत्राणे पूजेसाठी मिळावी असे साकडे घातले होते. मात्र वेतोबाने त्यासाठी परवानगी दिली नाही. या वेतोबाच्या दरबारात पोहोचल्यानंतरच त्याची खरी अनुभूती घ्यावी आणि अविश्वसनीय अशा मोठया आकाराच्या चामडयाच्या चप्पलांचा ढीग पाहावा. चपलांचे झीजलेले तळ पाहावे आणि देवासमोर नतमस्तक व्हावे.

सिंधुदुर्गातील वेतोबाचे स्थान हे असे विलक्षण आहे. जिल्ह्यात वेतोबाचा भक्त सांप्रदायही मोठा आहे. आरवलीच्या वेतोबाप्रमाणे, परुळेचेही वेतोबाचे स्थान प्रसिद्ध आहे.



मिलिंद आरोलकर.

वर्तमानपत्राच्या तळाशी असणाऱ्या चार ठिपक्यांचे रहस्य माहिती आहे का?

वर्तमानपत्राच्या तळाशी असणाऱ्या चार ठिपक्यांचे रहस्य माहिती आहे का?

⚫🔵🔴⚪

अशा खूप कमी व्यक्ती असतील की, त्यांचे लक्ष वर्तमानपत्रात असणाऱ्या ४ ठिपक्यांकडे गेले असेल व त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की हे का असतात. आणि तुमचे लक्ष त्या ठिपक्यांकडे गेले तरी तुम्हाला त्याविषयी माहिती नसेल. आज आम्ही तुमच्या माहितीसाठी माहिती देत आहोत या ठिपक्यांविषयी.

वर्तमानपत्रातील 4 ठिपक्यांचे महत्व
प्रत्येक वर्तमानपत्रात खाली ४ ठिपके एका ओळीमध्ये असतात. तुम्हाला वाटलेही असेल की तर ठिपके ट्राफिक सिग्नल सारखे असतील, पण असे नाही.        

पण याचा काय अर्थ आहे हे खूप कमी लोकांना माहिती असेल. या चार रंगाचे वर्तमानपत्रात खूप महत्व आहे. तुम्हाला माहिती असेलच की, मुख्य रंग तीनच आहे. ज्यामध्ये लाल, पिवळा आणि निळ्या रंगाचा समावेश आहे. या ठिपक्यामध्ये सुद्धा या 3 रंगाचा समावेश आहे आणि त्यात अजून एक काळा रंग ऍड झालेला आहे. या ठिपक्यामध्ये रंगाचा क्रम सर्वात अगोदर निळा, गुलाबी, पिवळा आणि शेवटी काळा रंग येतो.

वर्तमानपत्रातील हे चार ठिपके रेजिस्ट्रेशन मार्क्स असतात, जे की वर्तमानपत्रांची छपाई व्यवस्थित झालीये का नाही हे तपासण्यासाठी उपयोगी पडतात. हे ठिपके एका लाईनमध्ये असतात त्यामुळे वर्तमानपत्रात छापल्या जाणाऱ्या बातम्या आणि इमेज वेगवेगळया रंगात अचूकपणे छापल्या का नाही हे सुद्धा कळते. या रंगामध्ये थोडीही गडबड झाली तर समजून जायचं की वर्तमानपत्राच्या छपाई मध्ये सुद्धा गडबड झालेली आहे. या ठिपक्याचे एक स्थान अगोदरच ठरलेले असते. त्या स्थानावर जर हे ठिपके छापले नाही गेले तर छपाई मध्ये चूक झालेली समजते.

+ प्लसचे चिन्ह सुद्धा कधी कधी वापरले जाते
या ठिपक्यासोबत तुम्हाला बरेच वेळा प्लस(+) चे चिन्ह सुध्दा बघितले असेल. या चिन्हालाही या ठिपक्यासारखे महत्व आहे. या चिन्हामुळे वर्तमानपत्रातील माहिती व्यवस्थित ठरलेल्या रेषेत छापली गेली आहे का नाही कळते. या चिन्हामुळे वर्तमानपत्राचे कॉर्नर सुद्धा कळतात.


मिलिंद आरोलकर.

Friday 14 May 2021

टांगीनाथ धाम :- इथे आज सुद्धा आहे परशुरामांचा परशु

टांगीनाथ धाम :- इथे आज सुद्धा आहे परशुरामांचा परशु 
         
भारत हा चमत्कारांनी भरलेला देश आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला काही
 ना काही चमत्कारिक वस्तू दिसतेच.संस्कृतीने भरलेल्या ह्या देशात खुप अशा घटना ज्यांचा उल्लेख वेद आणि पुराणांत असून त्या कुठे तरी पुराव्यााच्या स्वरूपात आढळतांना दिसतात .आज आपण अशाच एका जागेची माहीती घेणार आहोत जी जागा झारखंड राज्यात असून तिथे आजही भगवान परशुरामांचा परशु दृष्टीस पडतो.हा तोच परशु आहे ज्याने परशुरामांनी पृथ्वीवरील अधर्मीय प्रवृत्तीचा पराभव करून धर्माचे रक्षण केले.
     टांगीनाथ धाम झारखंड राज्यात गुमला शहरापासून ७५ कि.मी.आणि रांची शहरापासून १५० कि.मी.अंतरावर वसलेल्या घनदाट जंगलाच्या मधोमध आहे. इथे आज ही भार्गवरामांचा परशु जमिनित गाडलेला आहे. 
परशुला झारखंडच्या भाषेत टांगी म्हटल जात. ह्यावरूनच ह्या जागेत नाव टांगीनाथ अस पडल.त्या जागी श्री परशुरामांचे पदचिन्ह सुद्धा दिसतात.

श्री परशुराम आणि टांगीनाथ ह्यांची अख्यायिका:- 
        सितास्वयंवरा वेळी मर्यादा पुरूषोत्तमाच्या हातून जेव्हा महादेवाचं धनुष्य भंग पावत आणि हे जेव्हा परशुरामांना कळत तेव्हा ते क्रोधावस्थेत तिथे येतात आणि रामावर त्या क्रोधाचा वर्षाव करतात परंतु ह्या क्रोधाला राम शांतपणे सामोरे जात असतामना लक्षमणाला मात्र ते सहन होत नाही व तिथे लक्ष्मण आणि श्रीपरशुराम ह्यांच्यात शाब्दिक द्वंद होत त्यावेळी श्री परशुरामांना ज्ञात होत की श्रीराम हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात सृष्टी पालनकरता ज्यांचा अवतार आपण स्वतः ही आहोत अशा विष्णुंचाच अवतार आहे तेव्हा स्वतःच्या अशा वागण्याच्या त्यांना पश्चाताप होतो व त्याच प्रायश्चित करण्यासाठी ते तपश्चर्येला एका घनदाट वनात जातात .इथे येऊन ते महादेवाची स्थापना करतात..व तिथे तपश्चर्येस बसतात बसतेवेळी त्यांच्याजवळील परशु ते जमिनीत गाडतात..ह्याच जागेला आज टांगिनाथ म्हणून ओळखले जाते..

   
      जागेसंबंधित काही आश्चर्यकारक गोष्टी :-

   १)इथे असलेल्या परशुबद्दल सर्वात आश्चर्यजनक बाब आहे ती म्हणजे हजारो वर्ष सतत हवा आणि पाणी ह्यांच्या संपर्कात राहून ही त्या परशुला अजून ही गंज चढलेला नाही आहे त्या अवस्थतेत अजून ही सुस्थितीत आहे.
२) दुसर आश्चर्य म्हणजे जमिनीत गाडला गेलेला परशु किती खोलवर आहे ह्याची अजूनही निश्चीती नाही पण हा परशु अंदाजे १७ फुट असावा असा अनुमान आहे..
३) सांगितल जात कीएक वेळा ह्या परिसरात राहणाऱ्या व लोहार काम करणाऱ्या समाजातील काही लोकांनी लोखंड मिळवण्याचा हेतूने परशु ला कापण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात ते अपयशी ठरले.उलट तसा प्रयत्न करणाऱ्यांचा एक एक करून मृत्यू होऊ लागला ह्याने भयभीत झालेली त्या जमातीने जसा तो परिसर सोडला तसा आजही त्या परिसराच्या १५ कि.मी च्या घऱ्यात अजून ही लोहार जातीचे लोक राहत नाही.
           सन १९८९ मध्ये पुरातत्व विभागाद्वारे केलेल्या खोदकामात सोने चांदीचे आभुषणांसह अनेक मौल्यवान व पुरातन वस्तू आढळून आल्या उदा.हिरे जडीत मुकुट चांदीचे अर्धगोलाकार शिक्के कानात घालण्यात येणारी सोन्याची बाळी तांब्याचा डबा ज्यात काळीतीळ आणि तांदूळ होते .ह्या सगळ्या गोष्टी आजही डमुरी येथील संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आल्या आहेत...
     टांगीनाथ येथे आढळलेल्या असंख्य अवशेष व वस्तूंवरून एक बाब ध्यानात येत ती म्हणजे हे स्थळ कधीकाळी हिंदूच एक प्रमुख तिर्थ स्थळ असाव . सरकारची उदासिनता आणि परिसरात असेलेल्या नक्षलवादाच्या प्रभावामुळे ह्या क्षेत्राकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाल आहे. त्यामुळे लोकांपर्यंत ह्या परशुरामांच्या पदस्पर्शाने व सहवासाने पवित्र झालेल्या ह्या तिर्थक्षेत्राची माहीती लोकापर्यंतलपोहचण शक्य झालेले दिसत नाही..कदाचीत सरकारने ह्याकामी लक्ष घातले तर ह्या संबंधित अधिक माहिती वैदिक महत्व लोकांना कळू शकते.
        
    जय परशुराम..!


मिलिंद आरोलकर - 

Wednesday 12 May 2021

पिक्चर मुंबईच्या रस्त्यावरचा....!

पिक्चर  मुंबईच्या रस्त्यावरचा....!



 काही दिवसांपूर्वी पडद्यावरच्या पिक्चर संदर्भातील जुने छायाचित्र मिळाले , आणि मन जवळ जवळ ४०-४५ वर्ष मागे भूतकाळात गेले.असंख्य आठवणींचा कल्लोळ झाला.साले काय दिवस होते. . माझे जे अनुभव आहेत तसेच माझ्या पिढीतील अनेकांचे असतील त्यांच्यासाठी खास हा लेख 
आमच्या लहानपणी तर सार्वजनिक सत्यनारायण पूजा, गणेशोत्सव व नवरात्रोत्सव हा रस्त्यावर पांढऱ्या पडद्यावर बघितलेल्या पिक्चरशिवाय पूर्णच होऊ शकत नाही.मंडळांमध्ये स्पर्धा असायच्या कोण लेटेस्ट सिनेमा लावतो ते. त्याकाळी मुंबईत रात्री रस्त्यावर किंवा मैदानात बांबूंना पांढरा पडदा बांधून प्रोजेक्टरवर पिक्चर दाखवले जात असत. .मुख्य म्हणजे फुकट असायचे मंडळातर्फे खर्च करायचे. दिवसा सायकलवर फिरून कुठे पिक्चर आहे ते बघायचे फळ्यावर खडूने लिहून ठेवलेले वाचायचे.आठ दहा दिवस अगोदर मित्रांमध्ये पण बातम्या मिळायच्या.मग तारीख लक्षात ठेऊन जायचो आणि विसरलो की हळहळ वाटायची. एका दिवशी दोन तीन ठिकाणी पूजा असायची मग चांगला सिनेमा असेल तिथे जायचे तो संपला की दुसरीकडे जायचे तिकडे जेवढा मिळेल तेवढा बघायचा.गणपतीमधे १० दिवस रोज सिनेमा असायचा.
सिनेमा बघताना मधेच पाऊस यायचा मग आडोशाला पळायचे.प्रोजेक्टर वर छत्री नाहीतर ताडपत्री धरायचे.त्याकाळी गणपतीत फार कमी पाऊस असायचा एखादी सर आली की थांबायचा. सत्यनारायणाच्या पूजा असतील तिथे जायचे. 
आम्ही कुठे कुठे जायचो कसेही कुठेही बसायचे रस्त्यावर बसायचे गोणपाट घेऊन, नाहीतर टॉवेल टाकून अगदीच काही मिळाले नाही तर वर्तमानपत्र किंवा नुसतेच डायरेक्ट रस्त्यावर बसायचो.त्यामध्ये कधीही लाज किंवा कमीपणा वाटला नाही आणि कोणी वाटून घेतला नाही.घरच्यांनीही कधी विरोध केला नाही.

प्रोजेक्टरचा सिनेमा बघणे खूप मजेशीर गोष्ट असायची.गंमत म्हणजे पडद्याच्या एका बाजूला लहान मोठ्या मुली व बायका बसायच्या तिथेच नेहमी प्रोजेक्टर असायचा आणि आपण लहान मोठी तरुण मुल पुरुष ,तर नेहमी विरुद्ध बाजूला त्यामुळे सगळे उलटे दिसायचे, हिरोईनची साडी गुजराथी पद्धतीने नेसली असे वाटायचे, सगळ्या ऍक्शन उलट्या दिसायच्या, फायटिंग उलट्या हाताची बघायची.हे सगळे नको असेल तर बायकांच्या साईडला सर्वात शेवटी उभे राहून बघायचं नाहीतर कडेला रेतीवर खडीवर बसून बघावे लागायचे ती खडी टोचायची.जेवढे लांब बसू तेवढा सिनेमा छोटा दिसायचा म्हणून पुढे बसायचे.सिनेमा बघताना भरपूर डास चावायचे मुंग्या चावायच्या तरीसुद्धा नेटाने प्रोजेक्टर वाल्याची बडदास्त ठेवायचे त्याला चहा नाष्टा असायचा. मंडळाचे पदाधिकारी आणि पाहुणे यांच्यासाठी खुर्च्या मांडायचे त्यांना टेबल फॅन असायचा.त्यांचा खूप हेवा वाटायचा.

 त्यावेळी.सिनेमा चालू असताना कधी प्रोजेक्टर खराब व्हायचा तर कधी लाईट जायचे मग बोंबाबोंब.मधेच उंदीर किंवा घूस यायची नाहीतर कुत्रे घुसायचे मग नुसती पळापळ. स्थानिक पोरांच्या माऱ्यामाऱ्या व्हायच्या.आजूबाजूचे लाईट बंद करायला लागायचे. पिक्चर स्टार्ट करताना रीळ लावल्यावर 6/5/4/3/2/1असे इंग्रजी मध्ये स्क्रीनवर यायचे तेव्हा नंबर ओरडायचो.एक रीळ संपले की दुसरे लावायचे.. काहीवेळा पिक्चरचा आवाज आणि चित्र सिंक्रो नाही झाले तर विचित्र वाटायचे ऍक्शन आधी आणि आवाज नंतर तरी बघायचो.  

सिनेमांत चांगल्या डायलॉगला, फायटिंगला, गाण्याला टाळ्या शिट्ट्या मिळायच्या मग परत रिवाइंड करून वन्स मोअर.इन्कार सिनेमातील मुंगळा गाण्याला तर तीन चार वन्स मोअर मिळायचे तेवढे वेळा रिवाइंड.पडद्यावर लव्ह सीन आला की पोर बोंब मारीत सोड सोड म्हणून ओरडत.

केश्तो असितसेन , मेहमूद , असरानी , जगदीप राजेंद्रनाथ , यांच्या कॉमेडीला जाम दाद मिळायची.गाण्यावर लोक रस्त्यात नाचायचे.शम्मी, देव, ऋषीं, अमिताभ, जितेंद्र, धर्मेंद्र, राजेशखन्ना यांच्या पिक्चरला खूप गर्दी व्हायची.सगळे डायलॉग पाठ असायचे लोकांचे.शोले, जंजीर दिवार, रोटी कपडा और मकान, ज्वेलथीफ, जंगली, अदालत, दामाद, चितचोर, जॉनी मेरा नाम,तिसरी मंझिल.वो कौन थी, कालिचरण किती नावे घेऊ हे सिनेमे थिएटर आणि रस्त्यावर असंख्य वेळा बघितले.

  मराठी पिक्चर ब्लॅक व्हाईट असायचे दामुअण्णा शरद तळवलकर , राजा गोसावी ,निळू फुले., सूर्यकांत रमेश देव , अशोक सराफ , दादा कोंडके , रवींद्र महाजनी ,सीमा , चित्रा , रेखा , जयश्री गडकर , रंजना ,उमा यांचे पिक्चर असायचे.सासुरवाशीण सिनेमा बघताना ललिता पवार आणि निळू फुले यांना बायका चक्क शिव्या द्यायच्या.त्यावेळी ते दोघ तिथे आले असते तर त्यांनी नक्की मार खाल्ला असता अशी परिस्थिती असायची.
 १९८२ साली भारतात एशियाड खेळाचे आयोजन करण्यात आले होते. भारतात पहिल्यांदा रंगीत टि.व्ही चा जमाना सुरु झाला . त्यावेळी सघन घरातल्यांकडे 'कलर टी.व्ही असायचा सोबत व्ही.सी.आर प्लेअर वा व्ही.सी.पी प्लेअरवर रंगीत सिनेमे कँसेट आणून पाहिले जात . पण सामान्यासाठी रस्त्यावरच्या पिच्करची क्रेज काही कमी झाली नाही . हे सगळ १९९० सालापर्यत सुरु होते पुढे केबल टी.व्हीचा जमाना आला व सगळच इतिहासजमा झाल. .
आठवणीत रमायला झाले की मन उचंबळून येते डोळे पाणावतात.कितीतरी सिनेमे बघितलेले आठवतात.
गेले ते दिन गेले
 
रस्त्यावर बघितलेल्या पिक्चरची मजा आता मल्टिप्लेक्सला शेकडो रुपये मोजून पण येणार नाही.आणि खिशातून पांच पैशाचे चणे दाणे खाण्याची चव फ़्रेंच फ्राईज बर्गर आणि पॉपकॉर्नला येणार नाही.आताच्या मुलांना ही मजा अनुभवाला कधीच मिळणार नाही.


मिलिंद आरोलकर -

Sunday 9 May 2021

विड्याच्या पानाच्या मागील दडलेल्या रंजक गोष्टी.!

विड्याच्या पानाच्या मागील दडलेल्या रंजक गोष्टी.!! 

पान खाणारा माणूस सोशिक असतो असं म्हणतात. चुका करणाऱ्या माणसाविषयी व्यसनी माणसाला जरा अधिकचा कळवळा असतो. खरंतर पानाने हॅबिट फॉर्मेशन होत नाही. पानात असं कुठलंही केमिकल नाही की ज्यामुळे सवय लागेल. पण नागवेलीच्या पानांचा जेव्हा विडा होतो तेव्हा त्याची चटक लागल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे पान हा सवयीचा प्रकार मानला जातो.

मुळात ते एक नॅचरल इन्स्टिंक्ट आहे. आपल्या मेंदूत विशिष्ट भाग असतो. सवय लागलेला प्रकार आपण खाल्ला की तिथून समाधानाचं केमिकल बाहेर पडतं. छान वाटतं. लेखकाच्या हातून एखादा सुंदर पॅराग्राफ लिहून झाला की त्याला एकदोन मिनिटं छान वाटतं. बाळाला दूध पाजल्यानंतर आईला जे समाधान मिळतं, आनंद मिळतो, ते फीलिंग ऑफ वेल बीइंग असतं. तो सुखद आस्वाद व्यसनातून वारंवार मिळतो. कारण तेच केमिकल वारंवार पाझरत राहातं. म्हणून आपल्याला व्यसन लागतं. मेंदूचा तो भाग तुम्हाला काहीतरी रिव्हर्ट करतो. मज्जातंतूंना त्याची सवय लागते आणि वारंवार छान छान वाटायला पाहिजे असं वाटतं राहातं. मग फ्रिक्वेन्सी वाढल्यामुळे सवय होते. चांगल्या गोष्टीची ती सवय आणि वाईट गोष्टीचं ते व्यसन. दोन्ही एकच.

पण विडा किंवा पान खाणं हे फक्त व्यसन किंवा सवयीच्या भिंगातून नाही बघता येत. विडा हा आपल्या संस्कृतीचा जीवनशैलीचाच एक भाग. मराठी लग्नांमध्ये विडे तोडण्याचा एक रोमॅण्टिक समारंभ असतो. तामिळ लग्नांमध्ये तांबुल चर्वणम् हा विधी आहे. आधी तांबुल होतं. नंतर पान झालं. तांबुलात काय काय टाकायचं, त्याची घडी घालण्याची पद्धत कुठली त्यावरून कोणत्या विडय़ाला काय म्हणतात, याचे पूर्वापार वेगवेगळे प्रकार आहेत.

देवस्थानात देवाला विडा देण्याचा प्रकारही आहे. आपण पान खातो तर आपल्या देवालाही तो देतो. देवाला पान देण्याचे हक्कही काही कुटुंबांना वाटून दिलेले आहेत. पूजा-नैवेद्य झाल्यावर देवाच्या तोंडाला विडा लावला जातो. मग कुटलेलं पान प्रसाद म्हणून दिला जातो. आंबेजोगाईच्या मंदिरात ही प्रथा आहे. दक्षिणेत कर्पूरयुक्त पान देवाला अर्पण केलं जातं. तांबुलाची पद्धत मोहंजोदडोपासून आहे. मुघलकालीन जेवढी पेण्टिंग आहे त्यात पान देणं, पान खाणं आहेच.
एकेकाळी पान खाणं कुणालाही चुकीचं वाटत नव्हतं. पुरुष आणि स्त्रिया दोघेही पान खात. घरातले पुरुष जेवण झालं की ते पान खात ओसरीत बसायचे. तोपर्यंत बायका जेवून घेत. बायकांचं जेवण झालं की मग एखाद्या लहान मुलाला पाठवून पानाचं तबक आत पाठवलं जायचं.

वऱ्हाडात तर एकवेळ कुणी जेवण विचारलं नाही तरी काही वाटायचं नाही, पण घरात आल्यावर पानदान समोर ठेवलं नाही तर तो सगळ्यात मोठा अपमान समजला जायचा. त्यामुळे विडा किंवा तांबुल हा मानाचा भाग होता आणि आहे. म्हणूनच विडा उचलणं वगैरे वाक्प्रचार रूढ झाले असावेत. विडा उचलण्याऐवजी आता ‘सुपाऱ्या’ घेतात.

आयुर्वेदातही तांबुल होताच. त्याचं आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व अधोरेखित केलेलं होतं. प्रत्येक प्रकारचा रस आपल्या अन्नात असायला हवा असं आयुर्वेद सांगतं. आपल्या आहारात सगळं आहे, फक्त तुरट रस जेवणात येत नाही. ज्याला कषाय रस म्हणतात तो जवळपास नाहीच. मग हा तुरटपणा कुठून आणायचा, तर पानातून! तसा तो आवळ्याच्या सुपारीतून पण येतो. पण जेवणानंतर पान खाल्ल्यावर छान वाटतं. मुखशुद्धी होते. ओरल कॅव्हिटी स्वच्छ राहते. श्वासाला दरुगधी येत नाही.

एवढंच नाही तर जखम भरून आणण्याची क्षमताही पानात आहे. जखमेवर पान बांधलं जातं. नवजात बाळाची बेंबी वर येऊ नये म्हणून नाळ कापलेल्या ठिकाणी जो पोटपट्टा बांधतात त्यातही नागवेलीचं पान बांधलं जातं

पान थोडं अ‍ॅसिडिक असतं. पण इतकं नाही की त्याचा त्रास होईल. कच्च पान खाल्लं की बेंबीच्या आसपास थोडं जळजळतं. त्यामुळे भूक लागते. पानात मेन्थॉलही असतं, त्यामुळे खरं तर वेगळी ठंडक घालण्याची आवश्यकता नसते.

पान कामोत्तेजक म्हणूनही वापरलं जातं. पानात अ‍ॅफ्रोडिझिअ‍ॅक घटक असतात असं परंपरेतून मानलं जातं. आयुर्वेदातही तसं सांगितलं आहे. म्हणूनच पलंगतोड पान वगैरे प्रकार विकसित झाले असावेत. पानात आणखी काही अ‍ॅफ्रोडिझिअ‍ॅक घटक टाकून त्याचं कामोत्तेजक स्वरूप आणखी वाढवताही येतं. शिवाय त्याच्याशी थोडा रोमान्सही जोडला गेला, त्यामुळे पानाला चांदीचा-सोन्याचा वर्ख आला. पानाच्या अनुषंगाने अनेक प्रेमकथा, गूढकथा आणि चावटिका निर्माण झाल्या.

 लखनौचा नवाब वाजिद अली शाहच्या पान खाण्यासंदर्भात अनेक दंतकथा आहेत. त्याच्या अनेक बेगमा होत्या. त्यामुळे त्याच्या पानात असे कामोत्तेजक घटक घातल्याचे दाखले सांगितले जातात. अशीही एक कथा आहे की, त्याने खाऊन टाकलेला चोथा त्याच्या भंग्याने खाल्ला आणि त्याचा असा काही परिणाम झाला की शेवटी त्या भंग्याच्या बायकोला वैद्याकडे न्यावं लागलं

मेहंदीप्रमाणेच पानाच्या बाबतीतही काही समज आहेत. नवऱ्याचं प्रेम खरं असेल नवऱ्याने भरवलेला विडा रंगतो, असंही महटलं जातं. पानासोबत रोमान्स आला आणि मग प्रेमाची पानं वेगळी झाली. मिठा पान विकसित झालं. त्यात गुलकंद आला. काही लोकांनी चुन्याला देखील नटवण्याचा प्रयत्न केला. पानात गुलाबाचा आणि केवडय़ाचाही सुगंधी एसेन्स आला.

‘देवदास’ कादंबरीतली देवदास-पारोची पहिली भेट होते तेव्हा देवदास पान खात असतो आणि हुक्का ओढत असतो, तेही शाळेला दांडी मारून. ‘शतरंज के खिलाडी’मध्ये दोघे बुद्धिबळाचा पट घेऊन बाहेर खेळायला जातात तेव्हा दिवसभराची पानं बांधून घेतात, असाही उल्लेख आहे. जुनेच नाही तर नवे उल्लेखही विडय़ाचं कौतुक करणारे आहेत.


संगीतकार एस.डी. बर्मन एकदा फुटबॉलची मॅच बघायला जात होते. एक सिने निर्माता गाणं मागण्यासाठी आला होता, त्यांनी त्यालाही गाडीत बसवलं. बर्मनदांनी सवयीने गाडीत बसून पान लावायला घेतलं. पण त्या निर्मात्याच्या प्रश्नांची सरबत्ती काही कमी होईना. शेवटी कंटाळून बर्मनदांनी त्याला गाडीतून उतरवलं. कुणीतरी विचारलं, ‘दादा तो तर पैसे घेऊन आला होता. त्याला कशाला उतरवलं?’ त्यावर ते म्हणाले, ‘जो आदमी मला पानही नीट खाऊ देत नाही, तो मला काम काय करू देणार?’

मुस्लिम राज्यकर्त्यांच्या काळात अनेक संस्थानिकांमुळे पानसंस्कृती आणि अय्याशी यांचं नातं निर्माण झालं. जिथे आरामशीर, जमीनदारीचं आयुष्य आहे अशा ठिकाणी तुम्हाला पानाचं प्रस्थ जास्त दिसेल. बनारसमध्ये दिसेल, कलकत्त्यात दिसेल. कलकत्त्याइतकं पान कुठेच खाल्लं जात नाही.

मुंबईत अय्याशी दिसत नाही. कारण मुंबई हे वर्किंग कम्युनिटीचा प्रकार आहे. तरीही मुंबईत पानाचा मोठा बाजार नळबाजारात असायचा. पहाटे चार वाजता हे पानांचं मार्केट सुरू व्हायचं. आता पानाचं मार्केट चुनाभट्टीला आलंय. मोठा गुंडाळा असतो, त्यात पाच हजारांपर्यंत पानं असतात. पानाचं शेल्फ लाइफ कमी असतं. त्यामुळे पानवाला कधीही पान वाया घालवत नाही. थोडं लागलेलं पान असेल तर तो कातरीने तेवढा भाग कापून टाकतो.


पान खाण्यामध्ये थोडी रंगबाजी आली. पान घ्या, ते नखला; अंगठय़ाच्या नखाने पातळ शीर आणि पापुद्रा निघाला पाहिजे. पानाच्या जातींप्रमाणे शीर कमी जास्त असते. पूना पान पातळ. पानाच्या गादीवर मिळतं. पूना पानात चोथा भरपूर असतो. पानात जेवढा चोथा कमी तेवढी पानाची प्रत चांगली. पानात जेवढा तिखटपणा अधिक त्याप्रमाणे पानाची प्रत ठरते. काही जणांना पिवळं जर्द पान लागतं. काहींना हिरवंगार पान लागतं. कलकत्ता पान तिखट आहे. त्याला बांगला पान असंही म्हणतात. पूना पानात तो तिखटपणा नाही. पण पानाला चव आहे. बांगला पान मोठं, तिखट आणि चोथा कमी असतो. मघई हे जोडीने खायचं पान. एकावेळी दोन पानं खावी लागतात. त्यात एकही शीर नसते. तोंडात विरघळून जातं. पण शेल्फ लाइफ कमी. पानाची उपज कमी. भरघोस येत नाहीत. त्यामुळे ते महाग असतं.


पान खाण्याच्या संस्कृतीबरोबर पान लावण्याचे प्रकारही विकसित झाले आणि त्यासोबतचे शिष्टाचारही. आपल्याकडे पानाच्या चटण्या बोटाने फिरवतात. उत्तरेत ते अशिष्ट समजतात. तिथे दांडीने किंवा पानाला पान लावून चुना, काथ आणि चटण्या एकत्रित केल्या जातात. पानाच्या या शिष्टतेच्या संस्कृतीसह रसिकताही येऊन चिकटली. त्यामुळे साहित्यात त्याचे रंग उमटले नसते तरच नवल.

ना. धों. महानोरांच्या ‘भलताच रंगला काथ लाल ओठांत’ या कवितेतला ठसका बघा..
त्या दिसी करुन दिला विडा
टिचला माझा चुडा, कहर भलताच

तसंच कवी शैलेंद्रच्या गाजलेल्या ‘पान खाये सैंयाँ हमारो’ मध्ये ‘ले आया जालीम बनारस का जर्दा’ला मिळणारा शिट्टय़ांचा प्रतिसाद विलक्षण असतो. राजा बढेंची ‘कळीदार कपुरी पान, कोवळं छान’ ही लावणी असू द्या किंवा माजघरात म्हटलेले पाळणे, ओव्या, गीतं असू द्या त्यात विडय़ाचे उल्लेख अपरिहार्य असायचे.

सुपारी

पानाची सवय लागते ती सुपारीमुळे. कारण सुपारीमध्ये अल्कलॉइड्स असतात. हीच अल्कलॉइड्स अफूमध्येही असतात. फक्त श्रेणीमध्ये फरक असतो. सुपारीतलं अल्कलॉइडस् हे शेवटच्या दर्जाचं असतं. त्यामुळे त्याची नशा होत नाही. पण सवय जरूर लागते. ही अल्कलॉइड्स जेव्हा सुपारी कच्ची असते तेव्हा जास्त असतात. सुपारी वाळत जाते तसे ते सुपारीच्या आतला पांढरा गाभा आहे त्यात जमा होत जातात. या गाभ्याप्रमाणे सुपारीची प्रत बदलते. श्रीवर्धनची सुपारी म्हणजे दिवेआगर, आंबेत, हरिहरेश्वर या पट्टय़ातली सुपारी. ती बाजारभावापेक्षा २०० रुपये अधिक प्रीमिअम खाऊन जाते. त्याचं कारण पांढरा गाभा जेवढा जास्त तेवढी सुपारीला चव जास्त. एरव्ही सुपारीला चव काडीची नाही. सुपारी ही अ‍ॅक्वायर्ड टेस्ट आहे. नैसर्गिकरीत्या ती कुणालाही आवडणार नाही. दोन-तीनदा खाल्ल्यानंतर तिची चव विकसित होत जाते. जशी वाइनची चव विकसित व्हावी लागते. सुपारी जेवढी कच्ची तेवढे तुमचे कान लाल होतात. सुपारीचा ठोठरा बसणे हा अनुभव घ्यायचा असेल तर कच्ची सुपारी खावी. आख्खं खानदान आठवतं. गुजरातमध्ये तिला काची सुपारी म्हणतात. नेपाळीत काचो सुपारी म्हणतात. उफाडय़ाच्या दिल घायाळ करणाऱ्या तरुण मुलीलाही काचो सुपारी अशीच उपमा आहे. तिथल्या लोकसाहित्यात ही प्रतिमा येते.

सुपारी किनारपट्टीवर केरळपासून आढळते. लाल-तांबडी माती सुपारीला धार्जिणी. मातीनुसार सुपारीची चव बदलते. सुपारीचं उत्पादन मँगलोरमध्ये जास्त होतं. आपल्याकडच्या सुपारीला श्रीवर्धनचा रोठा म्हणतात. यात मग खूप बारीक बारीक प्रकार येतात. मद्रासची चिकणी सुपारीही लोकप्रिय आहे. पण ती काथाच्या पाण्यात प्रोसेस केलेली असते. त्यामानाने तिचा कमी ठोठरा बसतो. सुपारी श्रीलंका, बांगलादेश, कलकत्ता या भागातही होते.

सुपारीत काहीतरी अद्भुत गुण आहेत अशी पहिल्यापासून धारणा आहे. तिच्यात काही मिस्टिक गुणधर्म आहेत. लग्नापासून ते मर्तिकापर्यंत जेवढे समारभं आहेत त्या प्रत्येकात सुपारी आहे.
बिहारी लग्नात पहिल्यांदा जी परात येते त्यात परात भरून सुपाऱ्या असतात.

मग सुपारीत नाना तऱ्हेचे ढंग सुरू झाले. उत्तर प्रदेशात वेगळे आणि दक्षिण भारतात वेगळे. दक्षिणेत सुपारीला कापराचा फ्लेवर मिळाला. त्यांच्या पानात कापूर घालतात. आपल्याला बुंदीच्या लाडवाला कापराचा वास आलेला चालणार नाही.   बुंदीच्या लाडवाला कापराचा वास नसेल तर ते अशिष्ट मानलं जातं.

सुपारीला ठोठरा बसतो, काथाचा कडवटपणा, चुन्याने जीभ भाजू शकते. यावर उतारा काय तर मग खोबऱ्याचा शिरकाव झाला, त्याने उग्रपणा थोडा कमी होतो. चवीला लवंग आले. (हे सगळे किनारपट्टीवरचे) नागवेल, सुपारीचं खांड, लवंगा, वेलदोडे, खोबरं. उत्तरेत केशर आलं. दक्षिणेत कापूर, क्वचित कस्तुरीचा उल्लेख आहे. पण ती कवीकल्पना असावी.

धार्मिक कार्यक्रमाला प्रथम यजमान पुरोहिताला एक सुपारी देतो. ही कशासाठी तर तुम्ही आमचे काम चालवा. आज वेगळ्या कारणासाठी सुपारी दिली जाते. काम झाल्यानंतर आशीर्वचनासह ती सुपारी यजमानाला परत दिली जाते. या प्रत्येक टप्प्याला आपण नाव दिलेलं आहे. लग्नातही पान-सुपारीच देण्याची पद्धत आहे.

काथ

आपल्याकडे खैराचं झाड तोडण्यावर बंदी आल्यानंतर काथ मिळवणं कठीण झालं. काथ महाग होऊ लागला आणि पानात परवडेनासा झाला. आता मलेशियातल्या जंगलातल्या गंबीर झाडाचा काथ आपल्याकडे येतो. तो फार चांगला नसतो.

तंबाखू

तांबुल भ्रष्ट केला तो तंबाखूने. तंबाखूने व्यसन पूर्णत्वाला नेलं. तंबाखू आल्यामुळे पानाचं नैतिक स्खलन झालं. सात्विक गृहिणीनं पटकन डोळा मारल्यावर जसं वाटेल तसं झालं. पोर्तुगीजांनी तंबाखू आणला. तंबाखूही मृत करून पानात वापरला जातो. त्याशिवाय त्याला नशा येत नाही. तंबाखूची हिरवी पानं गठ्ठे बांधून जमिनीत पुरून ठेवली जातात. त्यातलं क्लोरोफिल संपूर्ण संपल्यानंतर ती पिवळी पडल्यानंतर मग ती नशा येते. आजही गादीवर संपूर्ण तंबाखूचं वाळलेलं पान घेणारे शौकिन आहेत. 

खाण्याचा तंबाखू चवीला कडवट असतो. सुपारी आणि पान मिळून मग त्याचा कडवटपणा मरतो. वेगवेगळ्या काळात वेगवेगळे सुवास आले. पहिला केशर आला, काहींनी केवडा वापरला. सुगंधी तंबाखूला जर्दा म्हणतात. तीन गोष्टींसाठी भोपाळ प्रसिद्ध आहे. जर्दा, गर्दा आणि नामर्दा. सुगंधी तंबाखूची नशा आणि अतिसेवन अखेरीस वंध्यत्व आणते, असा अर्थ त्यातून ध्वनित होतो.

तंबाखूचे १२०, १६०, ३०० हे मुळात प्रकार नसून हे तेव्हाचे किलोचे भाव आहे. डीएस नावाची एक कंपनी परफ्यूम्ड तंबाखू बनवायची. त्यांचे दर हेच पुढे त्या तंबाखूच्या प्रकारांचे नाव झाले. या पानात टाकून खायच्या सुगंधी तंबाखूने क्रांती केली. जर्दा कुणी वेगळा खात नाही. हा पानात खायचा तंबाखू. यात भोलानाथ केसरवानी यांचं नाव फार फेमस आहे. पानाच्या ठेल्यावर भोला तंबाखू टाक, असं म्हटल्यावर तो एक हिरवा डबा काढतो. त्यावर एक मुच्छड माणूस दिसतो. हाच तो भोलानाथ केसरवानी. या भोलानाथने हा पहिला तंबाखू अजरामर केला. भोला, मग १२०, मग १६० लोकप्रिय होत गेले. तंबाखूचं सुगंधी मिश्रण तयार झालं.

किवाम

कजरारे गाण्यात एक ओळ आहे.. ‘तेरे बातों में किवाम की खुशबू हैं.’ किवाम म्हणजे तंबाखूचा चुरा वाया न घालवता त्याचं कूट करून जे मिश्रण केलं जातं ते किवाम. त्यातही नवरतन किवाम सगळ्यात फेमस. त्यानंतर राजरतन आला. यातला तंबाखूबरोबर जाणारा परफ्यूम महत्त्वाचा. दुसरा कोणताही सुगंध त्याबरोबर जात नाही. चार्ली वापरून तर कुणी खाणार नाही. या परफ्यूम शोधून काढणाऱ्यांनी कोटय़वधी रुपये कमावले.
पुलंनी लिहिल्याप्रमाणे खरा गाणारा फक्त पखवाज, तंबोरा आणि गळा यावर स्वर्ग उभा करतो. तसा बेसिक खाणारा पान, चुना, काथ, खातो. सुपारी वेगळी कातरून तोंडात टाकतो. मग तंबाखू खातो. मग पाच मिनिटांनी पिंक टाकतो.

पान अ‍ॅसिडिक, चुना अल्कलाइन, काथ म्युच्युअल, सुपारीत अल्कलॉइड्स. तरीही हे बेसिक चार घटक म्हणजे तंबोऱ्याच्या तारांसारखे मानले जातात. चांगल्या लावलेल्या तंबोऱ्यातून शुद्ध गंधार उमटतो. या चार घटकांचा एकत्र स्वाद गंधारासारखाच असतो. तो एक प्रकारचं सुखद फीलिंग देतो.

तरीही वाटतं की या तांबुल फॅमिलीत सगळं मारूनच तयार होतं. चुना भाजला की तयार होतो. काथ जिवंत झाड कापून त्याच्या गाभ्यातला रस काढून तयार होतो. काथाची भट्टी लावावी लागते. सुपारी सुकवावी लागते, तर तंबाखू जमिनीत गाडून ठेवावा लागतो. कुणाला तरी मारून, जाळून मग हे पदार्थ तयार होतात. पान सोडलं तर या तांबुलात रसरशीत काही नाही. पानाशी निगडित सगळे जिंदगी से हारे हुए लोक इथे जमा झाले आहेत. पण एकत्र आले तर वेगळंच रसायन होतं.

पण, पानातून रामायण कधीच तयार होणार नाही. झालंच तर महाभारतच. पान सोज्वळ नाही. खूप वेगवेगळ्या अफेअर्सनी तयार झालेली ही स्टोरी आहे.



मिलिंद आरोलकर

Friday 7 May 2021

आरे दूध केंद्र एक स्निग्ध आठवण.


आरे दूध केंद्र एक स्निग्ध आठवण.



त्यावेळी मुंबईत आमच्या लहानपणी अल्युमिनीयमच्या पातळ पत्र्याची झाकणं बसवलेल्या अर्ध्या लिटरच्या बाटलीत आरेचं दूध मिळायचं. दोन प्रकारचे दूध मिळायचे. होल आणि टोंड.. 

हे दूध वितरणासाठी मुंबईत जागोजागी आरेची वितरण केंद्रे होती. २/४/६ बाटल्यांचे क्रेट असायचे. त्यात रिकाम्या बाटल्या घेऊन आपल्या घराजवळच्या आरे वितरण केंद्रासमोर भल्या सकाळी रांग लावावी लागत असे.
  
दुधाची गाडी आली की मुंबई खऱ्या अर्थानं जागी व्हायची. सकाळच्या शांत प्रहरी काचेच्या बाटल्यांचा नाद कानावर पडायचा. घाई गडबडीत एखादी बाटली फुटली की रस्ता दुधी रंगाचा होऊन जायचा. सूर्य उगवतीला येईपर्यंत दूध केंद्रावरील रांगा कमी व्हायच्या. घरी नेलेल्या बाटलीच्या बुचाला आतून असलेली घट्ट साय लहान मुलं आवडीनं चाटून घ्यायची. बदलत्या काळात ही केंद्रं ओस पडू लागली. पण, आजही बाटल्यांचा नाद कानात घुमत आहे.
मुंबईत आणि आजूबाजूच्या परिसरात सध्या अनेक ‘ब्रँड’चं दूध सर्रास उपलब्ध आहे. हायफाय मॉलमध्ये गेलात तर अगदी ‘इम्पोर्टेड’ दुधाचे टेट्रापॅकही सहज मिळतात. दुधाविषयी किंवा ते विकत घेण्याविषयी आजच्या पिढीला काहीही अप्रूप नाही. मात्र, साधारण सन १९५०पासून मुंबईत संसार सुरू केलेल्या पिढीच्या आठ‌वणींच्या कप्प्यात एक स्निग्ध आठवण घर करून आहे. ती म्हणजे सरकारी दूध आणि ते पुरवणारी दूधकेंद्रं.

मुंबई म्हणजे न झोपणारं शहर. अगदी सुरुवातीपासूनच ते तसं होतं. पण, आताची ‘नाइट लाइफ’ तेव्हा नव्हती. डिस्को, पबमधील दणदणाटाऐवजी रात्री कारखाने आणि कापड गिरण्यातील यंत्रांची रात्रपाळीतील धडधड सुरू असायची. सकाळचा भोंगा वाजला की सगळ्याच मुंबईला जाग येऊ लागे. शाळेत जाण्याच्या तयारीत असलेल्या मुलांच्या जोडीला लगबग असे कामावर जाणाऱ्या मोठ्या मंडळींचीही. त्यासाठी पहिली धाव घेतली जाई नाक्यावरच्या दूधकेंद्राकडे. व्हीटी, चर्चगेटहून सुटणाऱ्या पहिल्या लोकल गाड्या, कुलाब्याहून निघणारी पहिली बेस्ट बस यांच्या जोडीला आणखी एक गाडी मुंबईकरांच्या सेवेसाठी भल्या पहाटे निघे. ती असे सरकारी दूध योजनेची गाडी. वरळी दुग्धशाळेतून अशा अनेक गाड्या मुंबईभर पसरलेल्या सरकारी दूधकेंद्रांवर दूध पोहोचवण्यासाठी बाहेर पडत. दुधकेंद्रावर जाण्यासाठी लवकर उठावं लागे. म्हणून त्यावेळी ती त्रासदायक बाब वाटायची.बऱ्याचदा घरातल्या ज्येष्ठांचं हे काम असे. आजोबा नसले तर बाबा, काका, दादा अशी मंडळी ते पार पाडत. दुधाची बाटली किंवा बाटल्या घरी आल्या की त्यांच्यावर पहिला हक्क बच्चेकंपनीचा. बाटलीचं बूच उघडून थंडगार मलईचा थर चाटण्यात मजा असायची. जणू आईस्क्रीमच. बाटली उघडण्याचे हे सोपस्कार पार पडले की दूधाची शुभ्र धार पातेल्यात पडे. चहाबरोबर चपाती , बिस्किटं किंवा खारी-बटर खाऊन मुलं शाळेसाठी आणि मोठी मंडळी कामासाठी रवाना होत’, .
‘पाऊस आणि थंडीच्या दिवसांत मात्र दूधकेंद्रावर जाण्याचा उत्साह कमालीचा मावळे. या दिवसांत आधार असे दुपारी येणाऱ्या दुधाच्या गाडीचा’, असायचा.
त्या काळी मुंबईत धान्य आणि दुधाची प्रचंड टंचाई जा‌णवत असे. त्यामुळे सरकारनं तेव्हा धान्य आणि दुधाचं रेशनिंग सुरू केलं होतं. १९५१मध्ये आरेमध्ये आशियातील पहिली दुग्धशाळा उभारण्यात आली. शासनाचा स्वतंत्र दुग्धव्यवसाय विभाग सन १९५८मध्ये स्थापन करण्यात आला. राज्यात ३८ दुग्धशाळा आणि ८१ शीतकरण केंद्रांची स्थापना करण्यात आली. ग्रामीण भागातील दुधाचं संकलन करून ते शहरी भागात आणण्यासाठी सहकारी संस्थांच्या माध्यमातून एक साखळी निर्माण करण्यात आली. गावस्तरावर प्राथमिक सहकारी दूध संस्था, तालुका व जिल्हा स्तरावर दूध संघ व त्यांच्यामार्फत शासनाकडे दूधपुरवठा अशी ही यंत्रणा होती. आता दूध प्लास्टिकच्या पिशव्यांतून मिळतं. तेव्हा सरकारी दूधही प्लास्टिक पिशव्यांतून मिळू लागलं होतं. पण, त्यापूर्वी हे दूध काचेच्या जाड बाटल्यांतून वितरित केलं जाई. ‘होल’ आणि ‘टोन्ड’ असे त्याचे दोन प्रकार होते. ‘होल’ दूध अधिक मलईदार आणि महाग. त्यामुळे ते सधन कुटुंबालाच घेणं परवडे. मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबं स्वस्त ‘टोन्ड’ दूध घेत. ‘होल’ दुधाच्या बाटलीचे बूच निळं असं आणि ‘टोन्ड’ दुधाच्या बाटलीचं पांढरं. नंतर ‘स्टँडर्ड’ हा आणखी प्रकार सुरू झाला. त्या दुधाच्या बाटलीचं बूच नारिंगी रंगाचं असे.

प्रत्येक कुटुंबाला ठरावीक प्रमाणातच दूध मिळावं, म्हणून सरकारी कार्ड असत. त्या कार्डावर कुटुंबप्रमुखाचं नाव आणि त्याचा दूध कोट्याची नोंद असे. अगदी सुरुवातीला पुठ्ठ्याचे कार्ड मिळायचे. नंतर प्लास्टिकचं कार्ड आलं आणि त्यानंतर अ‍ॅल्युमिनिअमचं. त्या काळी पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या गरीब मुलांसाठी पोषक आहार म्हणून चिक्की, एखादं फळ आणि सरकारी दूध रोज मिळेल याची व्यवस्था होती. पांढऱ्या बुचाच्या बाटलीतलं पाव लिटर दूध प्रत्येक विद्यार्थ्यांला मधल्या सुट्टीत प्यायला मिळे.
सन १९९१मध्ये सरकारी दूध योजना सहकारी दूध संघांकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. बारामती, कोल्हापूर, संगमनेर, पंढरपूर येथील सहकारी दूध संघांकडे ही योजना गेली. त्यानंतर १९९२मध्ये केंद्र सरकारनं दूध व्यवसाय खासगी उद्योग क्षेत्रासाठी खुला केला. त्यामुळे सरकार आणि सहकार क्षेत्राबरोबर खासगी व्यावसायिकही या व्यवसायात उतरले. १९८५ ते १९९५ हा काळ महाराष्ट्रात ‘धवल क्रांती’चा ठरला. सहकारी दूध संघाची शिखर संस्था कार्यान्वित होऊन महासंघाची दुग्धशाळा मुंबईत सुरू झाली आणि सरकारी दुधाची मुंबई-महाराष्ट्रातील बाजारपेठ आणखी आटली. मुंबईत आजही दूधक्रेंद्रे आहेत; पण, निळ्या, पांढऱ्या, नारिंगी बुचांच्या बाटल्या नाहीत. त्यांची जागा घेतलीय केशर-पिस्ता, बटरस्कॉच, स्ट्रॉबेरी अशा ‘फ्लेवर्ड’ दुधाच्या बाटल्या आणि टेट्रापॅकनी. हे दूध गोड आणि सुगंधी आहे, पण दूधकेंद्रांवरील बाटलीतल्या दाट मलईचा गोडवा त्यात नाही. ती चव चाखलेले कोणीही ते सांगेल!

आज त्या दुधाच्या बाटल्या, ते वायरचे क्रेट ॲल्युमिनियमचे कार्ड या गोष्टी इतिहासजमा झाल्यात. लोकांच्या विस्मृतित गेल्यात. आजच्या पिढीला या दुधाच्या बाटल्यांविषयी काहीही माहिती नसेल. पर्यावरणाचे शून्य प्रदूषण करणाऱ्या काचेच्या बाटल्या जाऊन पर्यावरणाला प्रदूषित करणाऱ्या प्लास्टिक पिशव्या आज वापरात आहेत. ही सुधारणा की ही अधोगती...


मिलिंद आरोलकर

Tuesday 4 May 2021

पाऊस कसा मोजतात ? पाऊस का मोजतात ? चला जाणून घेऊ !!



पाऊस कसा मोजतात ? पाऊस का मोजतात ? चला जाणून घेऊ !!

अमुक भागात इतका मिलीमीटर पाऊस पडला, तमुक भागात तितका सेंटीमीटर पाऊस पडला! ही नेमकी भानगड काय आहे? पण राव पाऊस किती पडला हे मोजणं शक्य आहे का? शक्य असेल तर कसं मोजतात आणि मुळात पाऊस मोजावा तरी का? पावसाबद्दल असले अनेक प्रश्न आपल्या डोक्यात असतात.. म्हणून चला तर शोधूया या सर्व प्रश्नांची उत्तर.

पावसाची मोजणी होते तरी कशी ?
पावसाचं प्रमाण मोजण्यासाठी पर्जन्यमापक यंत्राचा वापर केला जातो. लिटर प्रति चौरस मीटर ( litres per square meter) किंवा मिलीमीटर हे एकक वापरून पाऊस मोजला जातो. यात मेट्रिक पद्धतीत ‘मिलीमीटर’ तर ब्रिटीश पद्धतीत ‘इंच’ हे देखील एकेक वापरले जाते. पाऊस मोजण्यासाठी लागणारी यंत्र काहीशी वेगवेगळी असू शकतात. पर्जन्यमापक यंत्राचे प्रकार पुढील प्रमाणे :

पर्जन्यमापक यंत्राचे दोन प्रकार असतात.


१. रेकोर्डिंग पर्जन्यमापक
हे यंत्र स्वयंचलित असून याद्वारे नक्की किती पाऊस पडला याचा विश्वासार्ह अंदाज लावता येतो. पावसाचे पाणी भांड्यात जमा केले जाते आणि पडणाऱ्या पावसाच्या तीव्रतेतून माहिती गोळा केली जाते.

२. नॉन रेकोर्डिंग पर्जन्यमापक

नॉन रेकोर्डिंग पर्जन्यमापक हे अगदी साधे सोप्पे यंत्र असून याद्वारे निश्चित असं प्रमाण सांगता येत नसलं, तरी पाऊस किती पडला असेल याचा एक अंदाज बांधता येतो. ही पद्धती भारतात मोठ्या प्रमाणात वापरता येते. या उपकरणाला ‘सायमन्स रेनगेज’ म्हटलं जातं.

सर्वात आधी आपण नॉन रेकॉर्डिंग पर्जन्यमापकं बघुयात :
या यंत्राला जोडलेल्या फनेलमधून पाणी एका भांड्यात सोडलं जातं. एका विशिष्ठ प्रमाणावर पाणी जेव्हा भरते तेव्हा या भांड्यातून पाणी अपोआप एका नळीमधून काढून टाकले जातं. हे ठराविक प्रमाण भरत आल्यानंतर एक इलेक्ट्रिक सिग्नलद्वारे एक स्वयंचलित पेन कार्यरत होते आणि आलेख कागदावर पावसाचे प्रमाण नोंदवले जाते. या सिस्टममुळे २४ तासात पडलेल्या पावसाचं अचूक प्रमाण मोजता येतं. 



१. दैनंदिन पर्जन्यमापक

हे यंत्र थेट पावसाचे थेंब मोजण्याचं काम करतं. खास सेन्सरद्वारे परिसरात किती पावसाचे थेंब पडत आहेत हे मोजलं जातं आणि प्रत्येकी थांबाचे मापन करून एकूण किती पाऊस पडला असावा याचा अंदाज लावला जातो.

रेकोर्डिंग पर्जन्यमापकं.

हे यंत्र दैनंदिन यंत्रापेक्षा थोडं वेगळं असतं. यात वजनाद्वारे पाऊस मोजला जातो. पावसाच्या वजनावरून पावसाचं प्रमाण ठरवलं जातं.
 
 
१. टिपिंग बकेट रेन-गेज
रेकोर्डिंग पर्जन्यमापकं

या यंत्राला जोडलेल्या फनेलमधून पाणी एका भांड्यात सोडलं जातं. एका विशिष्ठ प्रमाणावर पाणी जेव्हा भरते तेव्हा या भांड्यातून पाणी अपोआप एका नळीमधून काढून टाकले जातं. हे ठराविक प्रमाण भरत आल्यानंतर एक इलेक्ट्रिक सिग्नलद्वारे एक स्वयंचलित पेन कार्यरत होते आणि आलेख कागदावर पावसाचे प्रमाण नोंदवले जाते. या सिस्टममुळे २४ तासात पडलेल्या पावसाचं अचूक प्रमाण मोजता येतं. 
 
.

२. ध्वनिद्वारे पर्जन्यमापन !

हे यंत्र थेट पावसाचे थेंब मोजण्याचं काम करतं. खास सेन्सरद्वारे परिसरात किती पावसाचे थेंब पडत आहेत हे मोजलं जातं आणि प्रत्येकी थांबाचे मापन करून एकूण किती पाऊस पडला असावा याचा अंदाज लावला जातो.
 
 
३. ऑप्टीकल रेन गेज !

ऑप्टीकल रेन गेज हे एक अॅडव्हांस यंत्र असून याला लेझर डायोड आणि फोटो ट्रांजिस्टर डिटेक्टर जोडलेले असतात. एका ठराविक पातळीपर्यंत पाणी जमा झाल्यानंतर ते पाणी भांड्यात उलटले जाते. उलटणाऱ्या पाण्यामुळे भांड्यात लावलेली लेझर बीम अॅक्टीवेट होते आणि या लेझर बीम मुळे यंत्रात फोटो डिटेक्टरच्या सहाय्याने पाण्याची नोंद केली जाते. सेन्सर मुळे अचूक नोंद घेण्यात हे यंत्र विश्वासार्ह मानलं जातं.

 
 
आता शेवटचा प्रश्न : पाऊस का मोजतात ?

या प्रश्नाचं उत्तर असं की वर्षभरात किती पाउस पडला यावरून पुढील वर्षी किती पाऊस पडेल आणि यावर्षीच्या मानाने गेल्या वर्षी किती पाऊस पडला होता याचा अभ्यास करण्यासाठी पाऊस मोजला जातो. पावसाचे कमी जास्त होणारे प्रमाण याविषयी यावरून अंदाज लावणे सोप्पे जाते. पावसाच्या प्रमाणामुळे भूगर्भात पाण्याची पातळी किती असेल आणि पुढील पावसाळ्या पर्यंत पाणी पुरेल की नाही याचाही अंदाज लावता येतो.



अर्थात या सर्व यंत्राद्वारे एक ठराविक अंदाज येत असला तरी पूर्णपणे अचूक माहिती देणारं यंत्र अजूनही बनलेलं नाही आणि म्हणूनच हवामान खात्याचे अंदाज काहीवेळा चुकतात.


मिलिंद आरोलकर

Monday 3 May 2021

मुंबईतील दादरमधील मराठी नाटयरसिक, कलावंतांशी हृद्य नाते जोपासणा-या श्री शिवाजी मंदिराचा आज ३ मे वर्धापन दिन.


आज ३ मे
मुंबईतील दादरमधील मराठी नाटयरसिक, कलावंतांशी हृद्य नाते जोपासणा-या श्री शिवाजी मंदिराचा वर्धापन दिन.
 श्री शिवाजी मंदिर चा शुभारंभ झाला तो ३ मे १९६५ रोजी.
मराठी रंगभूमी ही आज देशातील अत्यंत प्रगत रंगभूमी मानली जाते, याचे कारण तिचा पावणेदोनशे वर्षांचा वैभवशाली इतिहास एवढेच नसून ती सतत प्रवाही, पुरोगामी आणि कालसुसंगत राहिली, हेही आहे. चित्रपटाच्या उदयानंतर संगीत रंगभूमी अस्ताकडे निघाली असता तिने कात टाकली, काळानुरूप आपले रूप बदलले आणि ती पुनश्च बहरली. त्यानंतरही अनेक चढउतार तिने अनुभवले. या सर्व घटना-घडामोडींची जिवंत साक्षीदार असलेली मुंबईतली दादरच्या *श्री शिवाजी मंदिर* वास्तू आहे. मराठी व्यावसायिक रंगभूमीशी तिचे अविचल नाते आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक रंगकर्मीला एक ना एक दिवस आपण *श्री शिवाजी मंदिरच्या* मंचावर स्वत:ला जोखून बघावे असे वाटत असते, यातच या वास्तूची महत्ता दडली आहे. १९६५ साली जेव्हा मुंबईत बंदिस्त नाटय़गृह ही दुर्मीळ चीज होती त्या काळी *श्री शिवाजी मंदिर* बांधले गेले. अर्थात त्याआधीही ते खुले नाटय़गृह म्हणून अस्तित्वात होतेच. परंतु  श्री शिवाजी मंदिरचा बंदिस्त रंगमंच उपलब्ध झाला आणि १२ महिने १३ काळ मराठी नाटकांना कायमस्वरूपी रंगमंच मिळाला. या वास्तूच्या स्थापनेत महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांचे मोलाचे सहकार्य लाभले. गोवा राज्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर उद्‌घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दर्शनी भागात श्री शिवछत्रपतींचा भव्य पुतळा असलेले नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असे प्रेक्षागृह उभारण्याचा संकल्प मंडळाच्या स्थापनेवेळी सोडण्यात आला होता. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, रहस्यनाटय़, बालनाटय़ अशा सर्व प्रकारांतली नाटके इथे सादर होऊ लागली. निर्माते, लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ, रंगमंच कामगार यांच्या अनेक पिढय़ा श्री शिवाजी मंदिरच्या मांडवाखालून गेल्या, मोठय़ा झाल्या. ८०-९० च्या दशकापर्यंत *श्री शिवाजी मंदिरचा* कट्टा हा हौशी, होतकरू रंगकर्मीचा अड्डा होता. श्री शिवाजी मंदिरमध्ये आपला हुन्नर दाखवायची संधी एक ना एक दिवस आपल्याला मिळेल आणि आपण मोठे होऊ, नावारूपास येऊ, हे स्वप्न उराशी बाळगत कटिंग चहावर दिवसचे दिवस ढकलत या अड्डय़ावर नित्य हजेरी लावणाऱ्या अनेकांचे हे स्वप्न पुढे साकारतही असे. यातले कित्येक जण *श्री शिवाजी मंदिर* पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या छबिलदास रंगमंचावरून आलेले असत. छबिलदासच्या प्रायोगिक/ समांतर रंगभूमीवर नाटके करणारे रंगकर्मी आणि श्री शिवाजी मंदिर चे नाटकवाले यांच्यात एके काळी विस्तवही जात नसे. परस्परांना ते कमी लेखत. कारण त्यांच्यातला एक असे आपल्याला रंगभूमीवर जे ‘प्रयोग’ करायचे आहेत, त्याकरता म्हणून नाटक करणारा; तर दुसरा- रसिकांचे रंजन करण्याबरोबरच त्यांचे प्रबोधन करण्याचा वसा घेऊन नाटके करणारा. खरे तर दोघांचीही भूमिका मराठी रंगभूमी आणि मराठी संस्कृतीच्या उत्थानाकरता तितकीच महत्त्वाची होती. यथावकाश दोघांनाही आपले हे आग्रह दुराग्रह असल्याचे ध्यानी आले आणि त्यांच्यातला दुरावा संपला. म्हणूनच एके काळी छबिलदासवर सक्रिय असलेली मंडळी आज *श्री शिवाजी मंदिर* मध्ये आपली ‘प्रयोगसिद्ध’ नाटके सादर करताना दिसतात. श्री शिवाजी मंदिर ज्याने जिंकले, तो जगाच्या पाठीवर कुठल्याही रंगमंचावर हार खाणार नाही असे म्हटले जाते. ते खरेच आहे. याचे कारण *श्री शिवाजी मंदिर* चा प्रेक्षक सुशिक्षित, सुजाण, दर्जेदार अभिरुची बाळगणारा आहे. त्याला उडदामाजी काळे-गोरे चोखपणे पारखता येते. श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहाने अनेक दशके पहिली आहेत. वेळेनुसार घडणारे बदलही प्रेक्षकांनी पाहिले आहेत आणि पहात आहेत. मात्र आजही तोच पारंपारिक नाट्यकलेचा ठेवा या नाट्यगृहाच्या माध्यमातून जतन करून ठेवला आहे. आशिया खंडातील हे आदर्श नाट्यगृह आहे येथील दर्जेदार आणि निर्दोष ध्वनीयोजना, आसन व्यवस्था आणि प्रकाश योजना यांची विशेष काळजी घेतल्यामुळे जवळपास एक हजार प्रेक्षक एकावेळी बसून कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतात. वेळोवेळी होत असलेल्या देखभालीने नाट्यगृह अजून काही दशके सुस्थितीत चालेल अशी अपेक्षा आहे. *श्री शिवाजी मंदिर* मध्ये नाटक व तत्सम नृत्य, गीत, संगीताचा कार्यक्रम हमखास रंगतो असं आवर्जून सांगणारे अनेक रसिक आहेत. नटवर्य नानासाहेब फाटक, नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर, गणपतराव बोडस, मा. दत्ताराम, डॉ. काशिनाथ घाणेकर, डॉ. श्रीराम लागू, विमल कर्नाटक, मीनाक्षी शिरोडकर, सुधा करमरकर, आशा काळे यांच्यापासून आज लोकप्रिय असलेल्या विक्रम गोखले, मोहन जोशी, प्रशांत दामले, भरत जाधव यांच्यापर्यंत सर्वांचेच श्री शिवाजी मंदिर श्रद्धास्थान आहे. श्री शिवाजी मंदिराच्या  रंगमंचावर प्रवेश केला की वेगळंच स्फुरण चढतं, उत्साह संचारतो असे त्यांचे उद्गार आहेत. समाज प्रबोधनासाठी केले जाणारे लोकनाट्य, मुक्तनाट्य सादर करण्यात आली. श्री शिवाजी मंदिरने अनेक नवनव्या उपक्रमांना नेहमीचं प्रोत्साहन दिलं आहे, आश्रय दिला आहे. 
१९९३ च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांच्या घटनेआधी श्री शिवाजी मंदिरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचला जात आहे, हे एका कोकणी मुस्लीम प्रेक्षकाने श्री शिवाजी मंदिरच्या ट्रस्टींना पत्र लिहून सावध केले होते. त्या पत्राधारे आवश्यक ती खबरदारी घेतल्यामुळेच श्री शिवाजी मंदिर या हल्ल्यातून वाचले. या वास्तूच्या धर्मनिरपेक्ष पुण्याईमुळेच हे शक्य झाले.


मिलिंद आरोलकर .

Saturday 1 May 2021

संपुर्ण जुहूचा मालक रघुनाथराव राणे होता.


संपुर्ण जुहूचा मालक रघुनाथराव राणे होता .

"जुहू".

मुंबईमधली स्वप्ननगरी.

पर्यटकांनी भरलेला जुहू बीच आणि डोक्यावरून टोपी खाली पडेल अशा उंच उंच इमारती. इथल्या भेळपुरीपासून ते अमिताभ बच्चनच्या घरापर्यंतच्या अनेक कथा दंतकथा आपण ऐकलेल्या असतात. इथल्या शांत निवांत गल्ल्यांमध्ये मराठी माणसाला घाटी म्हणून हिणवणारे अतिउच्चभ्रू सेलिब्रिटी श्रीमंत लोक राहतात.

पण त्यांना काय ठाऊक या सेलिब्रिटीच्या जुहूचा मालक एक माणूस होता. नाव *रघुनाथराव राणे.*

जुहूचा इतिहास पहायचा झाला तर कमीत कमी हजार वर्षापूर्वीचे पुरावे सापडतात. 

बिम्बाख्यान नावाच्या बखरी नुसार ११३८ साली चंपानेरच्या प्रताप बिंब राजाने महिकावती (आजचे *केळवे माहीम*) हा भाग जिंकून घेतला. त्याने आपला प्रधान बाळकृष्ण सोमवंशीला *वाळकेश्वर* येथे पाठवल आणि या नव्या भागाचा सर्व्हे करायला सांगितला.

या बाळकृष्ण सोमवंशीने *केळवे माहीम, ठाणे, मढ, जुहू, वेसावे(व्ह्र्सोवा),* *वहिनाळे* आणि अखेर *वाळकेश्वर* या भागात तो फिरला. 
हाच जुहूचा पहिला उल्लेख. 

*अगदी शंभर वर्षापूर्वी पर्यंत जुहू हे एक बेट होतं.* अल्लाउद्दिन खिलजीकडून पराभूत झालेला सोरठचा मुरारराज या भागात आला. त्याच्या मुलाने बलदेवराजने बिंबराजाचे राज्य मुंबई भागात प्रस्थापित केले.

*१३०० च्या शतकात बलदेवराजचा मुलगा म्हणजे हैबतराव राणे.* 

*वांद्र्याच्या रन्वार खेड्यात तो राहू लागला. येथेच त्याने माहेश्वरी देवीच मंदिर बांधलं. याच हैबतरावाचे वंशज लक्ष्मणराव जुहूला वसले.*

पुढे दिल्लीच्या सुलतानीच्या काळात लक्ष्मणराव राणेंना जुहू गावाची पाटीलकी मिळाली. त्यांचा वार्षिक पगार होता ५० रुपये.

पुढे मुंबई प्रांतावर पोर्तुगीजांचे राज्य आले. त्यांनी मुंबई इंग्रजांना आंदण म्हणून दिली मात्र उत्तरेतील भाग मात्र स्वतःच्या हाती ठेवला. त्यांनी जुहूला जुवेम नाव दिले होते. तेथे भंडारी, मीठ व्यापारी शेती करणाऱ्यांच्या छोट्या वसाहती होत्या. जुहूचे रहिवासी प्रामुख्याने कोळी लोक होते. पोर्तुगीजांनी येथे १८५३ साली चर्च ऑफ सेंट जोसेफ हे चर्च बांधले.

अस म्हणतात की या राणेंच्या पैकी कोणी तरी पोर्तुगीजांच्या विरोधात मराठा आरमाराला मदत केली होती. पुन्हा तसे होऊ नये म्हणून पोर्तुगीजांनी त्यांच्या संरक्षणाची ग्वाही दिली आणि हे सुनिश्चित केले की राणे कुटुंब जुहूमध्ये राहील.

पण तरीही जेव्हा १७३७ साली पोर्तुगीज आणि मराठा युद्ध सुरु झाले तेव्हा राणेनी मराठ्यांची बाजू घेतली.
पुढच्या दोनच वर्षात चिमाजी अप्पाने वसईचा किल्ला जिंकून पोर्तुगिजांचा पराभव केला आणि साळशेत, ठाणेचा परिसर पेशव्यांच्या अधिपत्या खाली आला.
*त्यांनी राणेंना जुहूची सनद आणि तिथे नारळाची लागवड करण्याची परवानगी दिली.*

पुढे हा भाग मराठ्यांच्या कडून इंग्रजांच्या ताब्यात गेला मात्र त्यांनी देखील राणेंच जुहूंवरचे हक्क मान्य केले.

याच राणेंचे वंशज रघुनाथराव पुतळाजी राणे हे बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे हेड सर्व्हेअर म्हणून काम पहात होते. 

१८६८ साली जुहूमधील जुन्या मुक्तेश्वर मंदिराचे जीर्णोद्धार करत असताना त्यांना मध्ययुगीन पुरावे सापडले.

काही वर्षांनी जेव्हा त्यांनी मुक्तेश्वर मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस ब्रम्हकुंड नावाच्या बंधिस्त कुंडाची निर्मिती करण्यासाठी खड्डा काढला तेव्हा त्यात त्यांना *गजलक्ष्मीची मूर्ती* सापडली.
हिलाच आज *शितलादेवी* म्हणून पूजले जाते व जुहू बीच जवळ मिळालेल्या मूर्तीला जुहूची ग्रामदेवता म्हणून पूजले जाते. जुहूमध्ये उत्खनन करत असताना एक हाडांचा सांगाडा सापडला ज्याच्या तोंडात एक सोन्याच नाणं होतं ज्यावर देवनागरी मध्ये *‘रा’* असे कोरलेले आढळले. अशा अनेक गोष्टी राणे कुटुंबाने जपून ठेवल्या होत्या.

रघुनाथ राव राणेंचे सुपुत्र सुप्रसिद्ध चित्रकार कृष्णराव राणेंनी या ऐतिहासिक पुराव्यांचे म्युजियम मध्ये रुपांतर केलं. पण १९५५ साली आलेल्या चक्रीवादळात या म्युजियमच प्रचंड नुकसान झाल व ते आता बंद आहे. 

*मात्र आजही इस्कॉन टेम्पल समोरच्या राणे बंगल्यात यातील अनेक वस्तू आपल्याला पाहता येऊ शकतात.*

आज गगनचुंबी इमारतींचे जंगल बनलेल जुहू १०० वर्षापूर्वी पर्यंत एका छोट्याशा बेटावरील खेड होतं.

जमशेदजी टाटानी १८९० च्या दशकात येथे जमीन खरेदी केली आणि तिथे एक बंगला बांधला. पुढे इथे १२०० एकर जमीन घेऊन तिथे रिसोर्ट बांधायचा त्यांचा प्लॅन होता. कालव्यांनी जोडून जुहू बेटाचं व्हेनिसमध्ये रुपांतर करायचं टाटांच स्वप्न होतं. पण दुर्दैवाने त्यांच्या मृत्युनंतर ही योजना मागे पडली.

१९१९ साली जुहूमध्ये नगरपालिकेची स्थापना झाली. इंग्रजांनी सांताक्रूझ जुहू रस्ता बनवला आणि या भागाला मुंबईशी जोडून टाकले. याच जुहूमध्ये भारतातील पहिले विमानतळ सुरु झाले. मिठाचा सत्याग्रह व इतर आंदोलनातून जुहूनेदेखील स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. गांधीजींचे इथे बरेच काळ वांस्तव्य देखील होते.

स्वातंत्र्यानंतरच्या काळात इथे अनेक धनिकांनी, फिल्मस्टारनी जागा घेतली. भारतातील सर्वात महागडे दराच्या जमिनीमध्ये वरच स्थान जुहूने पटकावल. मात्र याच बरोबर इथला स्थानिक कोळी हळूहळू आपल्याच हक्काच्या घरातून हद्दपार होत गेला.


मिलिंद आरोलकर -

२३ एप्रिल: आज जागतिक पुस्तक दिन

२३ एप्रिल: आज जागतिक पुस्तक दिन २३ एप्रिल: आज जागतिक पुस्तक दिन. संपूर्ण जगभरात २३ एप्रिल रोजी 'जागतिक पुस्तक दिन' साजरा...