Monday, 26 October 2020

बंगाल मधील दुर्गापूजेचा प्लासीच्या लढाईशी सबंध...

दुर्गापूजेचा आणि प्लासीच्या लढाईचा काय आहे संबंध ? वाचा दुर्गापूजेचा रंजक इतिहास !!


गणेशोत्सव असावा तर महाराष्ट्रासारखा आणि नवरात्रोत्सव असावा तर पश्चिम बंगालरखा. कालपासून नवरात्राला सुरुवात झाली आहे. भारतात कुठेही होत नसेल एवढ्या धामधुमीत बंगालमध्ये नवरात्र साजरं केलं जातं. पण कधी विचार केलाय का की पश्चिम बंगालमध्येच दुर्गापूजा इतकी प्रसिद्ध का आहे ? या मागचं कारण काय असेल ?मंडळी, या प्रश्नाचं उत्तर आपल्या भारताच्या इतिहासातील एका निर्णायक लढाईत आहे. चला तर नवरात्रीच्या निमित्ताने हा इतिहास जाणून घेऊया.मंडळी, भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारं एक महत्त्वाचं युद्ध म्हणजे बंगालमधली ‘प्लासीची लढाई’. या लढाईने बंगाल प्रांत संपूर्णपणे इंग्रजांच्या घशात घातला. असं म्हणतात, प्लासीच्या लढाईने भारतावर इंग्रजांचं राज्य यायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तो काळ होता १७५७ चा.प्लासीच्या लढाईत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्यावतीने लढलेल्या रॉबर्ट क्लाईव्ह या अधिकाऱ्यानं या विजयाचं श्रेय ‘गॉड’ला दिलं. पण त्यांचे खास (आणि भारताचे ‘गद्दार’) ‘नबकृष्ण डेब’ यांनी एक वेगळाच तर्क काढला. ते म्हणाले नवाबाने प्लासी भागातलं चर्च उध्वस्त केल्याने तुम्ही माझ्या घरी येऊन दुर्गेची पूजा करा व तिचेच या विजयाबद्दल आभार माना. तेव्हा नबकृष्ण यांनी नुकताच  ‘शोभाबाझार राजबाडी’ (राजवाडी) नावाचा बंगला काय, चक्क महालच बांधला होता आणि  या महालात बंगालवर ब्रिटिश हुकूमत आल्याच्या आनंदातून त्यांनी दुर्गापूजेचं भव्य आयोजन केलं होतं. या पूजेला रॉबर्ट क्लाईव्ह यांना बोलावण्यात आलं. पूजा उरकली गेली. रॉबर्ट क्लाईव्ह यांनी देवीचे आभारही मानले. पुढे इंग्रजांशी जवळचा संबंध असल्याने या पूजेला ‘कंपनी पूजा’ हे नाव पडलं.असं म्हणतात की या भव्य दुर्गापूजेच्या आयोजनानंतरच बंगाल मध्ये ‘दुर्गापूजा’ प्रसिद्ध झाली. नबकृष्ण डेब यांनी त्यावेळी घालून दिलेल्या दुर्गापूजेच्या पद्धती पुढे बंगालमधल्या श्रीमंत कुटुंबांमध्ये लोकप्रिय झाल्या. आजही शोभाबझार राजबाडी महालात दरवर्षी दुर्गा पूजेचं आयोजन केलं जातं.असं म्हणतात की या भव्य दुर्गापूजेच्या आयोजनानंतरच बंगाल मध्ये ‘दुर्गापूजा’ प्रसिद्ध झाली. नबकृष्ण डेब यांनी त्यावेळी घालून दिलेल्या दुर्गापूजेच्या पद्धती पुढे बंगालमधल्या श्रीमंत कुटुंबांमध्ये लोकप्रिय झाल्या. आजही शोभाबझार राजबाडी महालात दरवर्षी दुर्गा पूजेचं आयोजन केलं जातं.मंडळी, ही झाली दंतकथा. खरं तर प्लासीच्या लढाईच्या अगोदरपासून बंगालमध्ये दुर्गापूजा होत आली आहे, मग प्लासीच्या लढाईनंतर असं काय बदललं की दुर्गा पूजेला एवढं महत्व आलं ?त्याचं झालं असं की, प्लासीच्या लढाईने जमीनदारीला चांगले दिवस आले. या जमीनदारांचा ब्रिटिश हुकुमतीत मोठा वाटा होता. ब्रिटिश सरकार जमीनदारांच्या बाजूने असल्याने जमीनदार गब्बर झाले. त्यांनी आपल्याकडच्या मालमत्तेला शोभेल असं दुर्गा पूजेचं डोळे दिपवणारं आयोजन करण्यास सुरुवात केली. त्यांच्या महालांना १० दिवसांसाठी राजवाड्याचं रूप यायचं. या प्रकारे जमीनदार आपल्या मालमत्तेचं आणि सत्तेचं प्रदर्शन भरवायचे.बारोवारी पुजेची संकल्पना सोप्पी होती. ‘बारो’ म्हणजे १२ आणि ‘वारी’ किंवा 'यारी' म्हणजे मैत्री. अनेक कुटुंबांनी एकत्र येऊन पूजेचं आयोजन करणे. पूजेसाठी लागणारा सर्व खर्च एकत्रितपणे उचलायचा. म्हणजे आपल्याकडच्या मंडळासारखं राव. जी पूजा एका घरात बंदिस्तपणे व्हायची ती आता सार्वजनिक होऊ लागली.बारोवारी पुजेची संकल्पना सोप्पी होती. ‘बारो’ म्हणजे १२ आणि ‘वारी’ किंवा 'यारी' म्हणजे मैत्री. अनेक कुटुंबांनी एकत्र येऊन पूजेचं आयोजन करणे. पूजेसाठी लागणारा सर्व खर्च एकत्रितपणे उचलायचा. म्हणजे आपल्याकडच्या मंडळासारखं राव. जी पूजा एका घरात बंदिस्तपणे व्हायची ती आता सार्वजनिक होऊ लागली.मंडळी, दुर्गापूजेला धनिकांच्या घरातून सर्वसामान्य जनतेत आणण्यात या घटनेचा सिंहाचा वाटा आहे. ही संकल्पना बंगालमध्ये प्रचंड प्रसिद्ध झाली. आज बंगालमध्ये जे भव्य ‘पंडाल’ पाहायला मिळतात त्याची पाळेमुळे ‘बाघबाझार’ पूजेत आहेत.

मिलिंद आरोलकर --

Friday, 23 October 2020

मुंबईचा पहिला शेअर घोटाळेबाज

BSE आणि राजाबाई टॉवर वसवणारा 'प्रेमचंद रायचंद' होता मुंबईचा पहिला शेअर घोटाळेबाज!!


मंडळी, शेअरबाजार घोटाळा म्हटलं की बहुतेकांना पहिलं नाव आठवतं हर्षद मेहताचं!! सर्व सामान्य माणसांपर्यंत शेअर बाजार पोहचला तो हर्षद मेहेतामुळेच. त्याआधी हा बाजार काही मोजक्या सामाजिक वर्तुळापुरताच मर्यादित होता. जी काही अफरातफर व्हायची ती या वर्तुळाच्या परिघाच्या आतच व्हायची. हर्षद मेहताने हा परिघ राष्ट्रीय पातळीवर नेला आणि त्यामुळे घोटाळा म्हटलं की त्याचंच नाव पहिल्यांदा आठवतं. पण मंडळी, आज आम्ही तुम्हाला तब्बल दिडशे वर्षं जुनी अशी मुंबई शेअर बाजाराच्या एका 'आद्य 'घोटाळेबाजाची कथा सांगणार आहोत. "इतकी जुनी कथा ऐकण्यात काय मजा आहे आहे?" असं तुम्ही म्हणालही. पण गंमत अशी आहे की १८६२ च्या दरम्यानच्या त्या घोटाळ्यात आणि हर्षद मेहताच्या १९९२ घोटाळ्यात काहीही फरक नाही. फक्त इसवी सनाचे आकडे बदललेले दिसतील, नावं वेगळी दिसतील, बाकी ज्याला 'मोडस ऑपरेंडी' म्हणजे गुन्हा करण्याची पध्दत म्हणतात, ती आहे तशीच आहे. चला तर, आता वाचू या मुंबई शेअर बाजाराच्या आद्य घोटाळेबाज प्रेमचंद रायचंदच्या 'बॅकबे रेक्लेमेशन ' फ्रॉडबद्दल!!

(प्रेमचंद रायचंद)
या कथेला सुरुवात करण्यापूर्वी काही थोडी माहिती शेअरबाजाराबद्दल जाणून घ्या. या बाजारात नफा नुकसान ज्या पद्धतीने होते त्याला ' झिरो सम गेम असे म्हणतात. याचा अर्थ असा की एकाने गमावल्याखेरीज दुसर्‍याचा फायदा होत नाही. थोडक्यात नफा आणि नुकसान यांची बेरीज केली तर उत्तर शून्यच येईल. दुसरे असे की, प्रत्येक अफरातफरीत कमीतकमी एका बँकेचा तरी बळी जातोच. हर्षद मेहतामुळे कराड बँक गेली, केतन पारेखमुळे माधवपुरा बँक आणि ग्लोबल ट्रस्ट या दोन बँका बुडल्या, तर ज्या प्रेमचंद रायचंदबद्दल आपण वाचणार आहोत, त्यांच्यामुळे बाँबे बँक बुडली. आता वळू या मुख्य कथेकडे !
प्रेमचंद रायचंद हा रायचंद दिपचंद या श्रीमंत व्यापार्‍याचा मुलगा होता. त्याची आणखी ओळख म्हणजे बाँबे स्टॉक एक्सचेंज म्हणजे ज्याला तेव्हा नेटीव्ह स्टॉक एक्सचेंज म्हणायचे त्याच्या स्थापनेत हातभार लावला आणि आपल्या आईचं- राजाबाईचं नांव मुंबई विद्यापीठाच्या राजाबाई टॉवरला दिलं जावं म्हणून एकूण ५,५०,००० खर्चापैकी २ लाख रुपयांची भरभक्कम देणगी दिली. जात्याच हुषार असलेल्या या मुलाने जर इंग्रजी शिक्षण घेतले तर व्यापारात फायदा होईल या विचाराने वडिलांनी त्याला एल्फिन्स्टन महाविद्यालयात घातले. अपेक्षेप्रमाणे प्रेमचंद रायचंद हा मुंबई शेअर बाजारातला अस्खलित इंग्रजीतून व्यवहार करणारा पहिला स्टॉकब्रोकर झाला. काही दिवसांतच एक नंबरचा "बुलियन ट्रेडर" (सोने चांदीचा व्यापारी) आणि कमोडीटी ट्रेडर (त्यावेळी मुख्यतः कापूस आणि अफू) असे नाव पण त्याने कमावले. आता या सगळ्याचा मूळ कथेशी काय संबंध आहे ते बघू या!!

हा कालखंड साधारण १८६२ ते १८६६ चा होता. या काळात ब्रिटिशांना भारतातून कापूस आणि चीनमधून चहा मोठ्या प्रमाणात लागायचा. चीनला त्या मोबदल्यात अफू आणि चांदी हवी असायची. मँचेस्टरच्या कापडगिरण्यांसाठी ब्रिटनला कापूस हवा असायचा. पण या व्यवहारात ब्रिटनमधली चांदी संपुष्टात यायला लागली. साहजिकच भारतात चांदीचे भाव भडकले. अमेरिकन यादवीमुळे कापसाचे भाव भडकले. या दोन्हीत तेजी आल्यावर त्यात सट्टा सुरु झाला. हा सट्टा प्रेमचंद रायचंदच्या हातात होता. दुसरी गोष्ट अशी की त्यावेळी सर्व आंतरराष्ट्रीय व्यवहार हुंडीवर चालायचे. प्रेमचंद रायचंदच्या पेढीची हुंडी म्हणजे शंभर ट्क्के विश्वासार्ह, अशी ख्याती असल्याने कोणताही व्यवहार प्रेमचंद रायचंदच्या मध्यस्थीशिवाय पार पाडायचा नाही. थोडक्यात, मार्केट कोणतेही असो, त्या मार्केटच्या नाड्या किंवा सूत्रे एकाच माणसाच्या म्हणजे प्रेमचंद रायचंदच्या हातातच असायची!! अतिशय हुशार, धूर्त आणि दानशूर अशा या माणसाला त्याच्या कॉटन मार्केटच्या आणि शेअर बाजारातील यशस्वी सट्टय़ांमुळे मुंबईचा सगळ्यात मोठा सटोडिया हा किताब मिळाला होता. या प्रेमचंद रायचंद माणसाची खासियत अशीही होती की त्यांने घेतलेले शेअर्स त्याच्या नावावर कधीच नसायचे. मुनीम, मेहता, कारकून यांच्या नावावर तो सगळी गुंतवणूक करत असे.

असा धूर्त, हुशार आणि कावेबाज माणूस नेहेमी एखाद्या 'वन्स इन लाइफ टाइम 'मोक्याच्या शोधात असतो आणि संधी प्रेमचंद रायचंदच्या आयुष्यात अब्राहम लिंकनमुळे आली!! १८६० साली अब्राहम लिंकनने अमेरिकेतली गुलामगिरीला संपवली आणि अमेरिकेत यादवी सुरु झाली. मँचेस्टरला येणारा कापूस बंद पडला. भारतीय कापसाला प्रचंड मागणी आली. न्यूयॉर्कच्या कापसाच्या भावावर सट्टा सुरु झाला. भारतात तर न्यूयॉर्क कॉटनवर आकडा लावण्याची साथच आली. लोक त्यांच्याकडे आहे नाही ते सगळं काही विकून सट्टा खेळायला लागले. खेळीया अर्थातच एकच होता- तो म्हणजे प्रेमचंद रायचंद!! या सट्ट्यात प्रेमचंद रायचंदने इतके पैसे कमावले की त्याने चक्क एक बँकच विकत घेतली. त्या बँकेचं नाव होतं बाँबे बँक. एकदा बँक हातात आल्यावर त्याला आकाश मो़कळे झाले आणि जन्माला आली बॅकबे रेक्लेमेशन कंपनी!

तर, त्याकाळात मुंबईत कापसाच्या सट्टय़ात लोकांनी लाखो रुपये कमवायला सुरुवात केली होती. तेव्हाच मुंबईत नव्या कंपन्यांचे पेव फुटले. त्या एका वर्षामध्ये एकूण सत्तेचाळीस कंपन्यांची नोंदणी झाली. बँका तेव्हा शेअरमध्ये पैसे गुंतवण्यास कर्ज द्यायच्या नाहीत. प्रेमचंद रायचंदनी आपल्या वडिलांकडून पैसे घेऊन या बाँबे बँकेला कर्ज दिले आणि हळूहळू बँक ताब्यात घेतली. यानंतर इतर बँकांनीही शेअर्समध्ये सट्टा करण्यासाठी कर्ज द्यायला सुरुवात केली. सोबत स्वत:साठीही प्रचंड प्रमाणात कर्ज घेतले. पेपरमधली जाहिरात पूर्ण न वाचताच शेकडो अर्ज कंपन्यांकडे पैशांसकट येऊन पडायचे. शेअर्सची अलॉटमेंट होण्याआधीच त्यात सौदे लिहायला सुरुवात व्हायची. त्यावरचे प्रीमियम जाहीर व्हायला लागले. सगळ्या कंपन्यांना एकच दलाल हवा असायचा- प्रेमचंद रायचंद. बऱ्याच वेळा कंपन्या सटोडियाला पैशाऐवजी आणखी शेअर्स द्यायच्या. सटोडियाचं आणखी फावायचं. 

(कॉटन बाजार)
या सगळ्या नवीन उदयाला येणाऱ्या कंपन्यांत अशीच एक नवी कंपनी आली. बॉम्बे लँड रेक्लेमेशन कंपनी. या कंपनीला बॅकबे कंपनी म्हणून पण ओळखलं जायचं. आता जिथे नरिमन पॉइंट आहे, ती सगळी जमीन भराव टाकून ताब्यात घेण्याचं काम ही कंपनी करणार होती. त्याच वेळी भायखळा माझगाव परिसरात आणखी एक कंपनी आली. माझगावच्या बाजूला असलेला समुद्र हटवून जमीन तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवून ही कंपनी तयार झाली होती. प्रेमचंद रायचंद यांच्या हुशारीचा एक किस्सा सांगितल्याशिवाय ही कथा पुढे सांगणं कठीण आहे. माझगावच्या डेव्हलपिंग राइट्सची किंमत साधारण पाच लाख गृहित धरली गेली होती. प्रेमचंद रायचंदनी हे राइट्स चाळीस लाख रुपये देऊन सकाळी विकत घेतले आणि संध्याकाळी साठ लाखाला विकून टाकले. सहा तासांत वीस लाख रुपये, तेही १८६४ सालचे वीस लाख रुपये या माणसाने कमावले होते. 
तारतम्याचा अंत झाला की तेजी संपुष्टात येते..

(प्रेमचंद रायचंदचा बंगला)
हळूहळू मुंबईला तेजीच्या ज्वरांनी पछाडलं. जे शेठ करेल, तेच मुनीम करायला लागला, मुनीम करेल तेच मेहता म्हणजे अकाऊंटंट करेल, मेहता करेल ते कारकून कारकून करेल ते ड्रायव्हर आणि माळी. मुंबई शेअर बाजार तापून लाल झाला. आधी बॅकबे कंपनीचे चारशे शेअर्स सरकार घेणार होते, पण तो इरादा ऐनवेळी सरकारने बदलला. मग त्या चारशे शेअर्सचा लिलाव करण्यात आला आणि मग दोन लाख रुपयांचे शेअर्स दहा कोटी पाच लाखाच्या बोलीस विकले गेले.
आणि एक दिवस अमेरिकेतलं युद्ध संपलं. कापसाच्या व्यापाराला मंदीचं ग्रहण लागलं. सटोडिये पैसे चुकवायला टाळाटाळ करायला लागले. दिवाळखोरीची लाट आली. शेअर बाजार तीन दिवस बंद ठेवला गेला. पण पैशाची तरतूद होईना. एकामागोमाग कंपन्या बंद पडायला लागल्या. बॅकबे कंपनीसकट सगळ्या कंपन्यांनी गाशा गुंडाळायला सुरुवात केली. एकेक करून सगळे ब्रोकर दिवाळखोर झाले. आपले कथानायक प्रेमचंद रायचंद यांची सगळी मालमत्ता विकल्यावर एकूण देण्याच्या फक्त दीड टक्के रक्कम वसूल झाली. अशा तऱ्हेने बाँबे बँकही बुडाली.

(बँक ऑफ बॉम्बे)
वाचकांना एक विनंती... प्रेमचंद रायचंद यांच्या वर लिहिलेल्या कथेत फक्त हर्षद मेहता हे नाव टाका, कथा तशीच्या तशीच आहे. केतन पारेखचं नाव टाकून बघा, कथा तशीच आहे. तशीच तेजी! तसंच वारं डोक्यात जाणं! तसाच अंत!! फरक एवढाच की, हर्षद मेहता आणि केतन पारेख यांनी फ्रॉड करताना एक पायरी पुढे जाऊन खोटी कागदपत्र वापरली. या सटोडियांमध्ये साम्य असं की त्यांना आपण कुणीतरी महान झाल्याचा साक्षात्कार झाला होता. प्रेमचंद रायचंदने बांधलेला मुंबईचा राजाबाई टॉवर आजही याची साक्ष देतो आहे.
हे फ्रॉडस् कसे आणि का घडतात?

(हर्षद मेहता, प्रेमचंद रायचंद आणि केतन पारेख)
तर, छोटे छोटे गुंतवणूकदार असेच अल्पकाळाची स्मरणशक्ती असलेले असतात. एक फ्रॉड संपला की दुसरा घडेपर्यंत सगळेजण सगळं काही विसरलेले असतात. याआधीचे सगळे घोटाळे झाले तेव्हा आपण ग्लोबल नव्हतो. आपल्या अर्थव्यवस्थेच्या समस्या आपल्या खाजगी होत्या. आता ग्लोबल झाल्यावर जागतिक समस्या पण आपल्याच समस्या आहेत किंवा आपल्या समस्या जागतिक आहेत. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे प्रॉब्लेम आपले आहेत.

मिलिंद आरोलकर --

Thursday, 3 September 2020

मुंबईच्या चर्चमध्ये हिंदू ब्राह्मण पुजाऱ्याचा पुतळा...!

म्हणून मुंबईच्या चर्चमध्ये हिंदू ब्राह्मण पुजाऱ्याचा पुतळा उभारण्यात आला - 

मुंबईच्या फोर्टमध्ये एक चर्च आहे. सेंट थॉमस कॅथेड्रल ॲंग्लीयन नावाचं हे चर्च. रिझर्व बॅंकेपासून हाकेच्या अंतरावरच हे चर्च उभारण्यात आलेलं आहे. याच चर्चमध्ये संगमरवरी शिल्प आहे.

धोतर नेसलेला, खांद्यावर उपरणं असलेला, घेरा व शेंडी असलेला ब्राम्हण पुजारी एका वडाच्या झाडाला टेकून उभा आहे. व ते वडाचे झाड शोक करत असल्याचं दिसून येत आहे. एका चर्चमध्ये हिंदू ब्राह्मण पुजाऱ्याचा पुर्णाकृती पुतळा असणारं हे जगातील एकमेव चर्च आहे.

साहजिक तुम्हाला प्रश्न पडला असेल हे सगळं कशामुळे आणि का..? 
चर्चमधल्या ब्राह्मण पुजाऱ्याची गोष्ट समजून घेण्यासाठी तुम्हाला जोनाथन डंकन नावाचा माणूस माहित हवा. जोनाथन डंकन हा मुंबईचा गव्हर्नर होता. इसवी सन १७९५ ते १८११ या काळात तो मुंबईचा गव्हर्नर राहिला.

मुंबईचा सर्वाधिक काळासाठी म्हणजे १६ वर्ष तो गव्हर्नर होता. १८११ साली त्याचा मृत्यू झाला, नाहीतर तो अजून काहीकाळ गव्हर्नर राहिला असता अस सांगितलं जातं. 

जोनाथन डंकन भारतात आला ते साल होतं १७७२. वयाच्या १६ व्या वर्षी तो भारतात आला आणि वयाच्या ५५ व्या वर्षी तो गेला. तो भारतात असतानाच गेला. इतक्या काळात तो इंग्लडला कधीच गेला नाही. १६ व्या वर्षी त्याने इंग्लड सोडलं ते कायमचं.

या काळात काय झालं तर १६ व्या कोलकत्त्याला आल्यानंतर तो ईस्ट इंडिया कंपनीत छोट्या पदावर काम करू लागला. १७८८ या आठ वर्षात तो हलक्या दर्जाचं काम करत राहिला त्यानंतरच्या काळात तो तत्कालीन व्हाईसरॉय कॉर्नव्हालिसच्या नजरेत आला. कार्नवालिसने त्याचा प्रामाणिकपणा पाहून त्याला बनारसचा रेसिडेन्ट केलं.

रेसिडेन्ट हा त्या भागाचा प्रमुख असायचा. त्याला तिथले कर गोळा करण्यापासून ते युद्ध करण्यापर्यन्तचे अधिकार असायचे. पण या माणसाने बनारसच्या विकासाचा अध्याय सुरू केला. 

त्याला समजलं की इथे असणाऱ्या राजकुमार जातीत स्त्रीभ्रूण हत्या करण्याची अमानवीय प्रथा आहे. त्या काळात या जमातीची लोकसंख्या ४००० च्या आसपास होती पण मुलींच प्रमाण नगण्य होतं. डंकनने कंबर कसली या प्रथेमागच्या कारणांचा शोध घेतल्यानंतर त्याला कळालं की, हुडांप्रथेमुळं स्त्रीभ्रूण हत्या करण्यात येते. तो या हत्या बंद करण्याच्या मागे लागला. त्यासाठी कायदा आणण्याची शिफारस त्याने कॉर्नवालिसला पत्र लिहलं.

बनारसला संस्कृत विद्यापीठ उभा करण्याची गोष्ट. 

डंकन या इंग्रज माणसाने बनारसमध्ये संस्कृत विद्यापीठ उभा केले. १७९१ मध्ये त्याने हा प्रस्ताव कॉर्नवालिसला दिला. त्याच्या संमतीनंतर संस्कृत विद्यापीठ बनारसमध्ये उभा करण्यात आले. या विद्यापीठातून वेद, वेदांत, पुराणे, आयुर्वेद, साहित्य, ज्योतिष्यशास्त्र, धर्मशास्त्र, न्याय अशा विषयांबाबत शिक्षण देण्यास सुरवात करण्यात आली.

त्याच्या या योगदानाची साक्ष देणारा शिलालेख आजही बनारसच्या संस्कृत विद्यापीठात आहे.

त्याच्या कामावर खूष होवून त्याला मुंबईचे गव्हर्नर करण्यात आलं. 

मुंबई प्रांतात आजच्या कर्नाटकापासून ते गुजरातपर्यन्तचा भाग येत होता. या सर्व भागाचा मुख्य कारभार डंकनच्या हाती आला. मुंबईचा गव्हर्नर असताना गुजरातच्या पोरबंदर, बडोदा भागातल्या स्त्रीभ्रूण हत्येबाबत त्याला माहिती मिळाली. याचा मागोवा घेत तो बडोद्याला पोहचला.

त्याला समजलं की जडेजा समाजात मुलगी जन्माला आली की नवजात मुलीला नदीकाठी घेवून जातात तिथे एक खड्डा खोदून तो खड्डा दूधाने भरण्यात येतो. याच खड्यात लहान मुलीला बुडवून मारण्याची अमानुष प्रथा आहे.

या अमानवीय प्रथेविरोधात त्याने प्रयत्न सुरू ठेवले. त्याने जडेजा समाजाबरोबर बोलणी करून तूम्ही ही प्रथा बंद केल्यानंतर कंपनी तुम्हाला काही खास अधिकार देईल अस सांगितलं. त्याची बोलणी कामी आली. त्यानंतरच्या काळात जडेजा समाजातून ही प्रथा नष्ट होण्यास मदत झाली. 

स्त्रीभ्रूण हत्येसाठी लढणारा या डंकनचा मृत्यू १८११ साली झाला. वरती आपण ज्या चर्चचा उल्लेख केला त्याच चर्चमध्ये त्याचे पार्थिव पुरण्यात आले. व त्याच्या गौरवार्थ त्याच्या मृत्यूचा शोक करणारे शिल्प या चर्चमध्ये कोरण्यात आले.

संस्कृत विद्यापीठाची स्थापना करणाऱ्या डंकनच्या मृत्यूचा शोक ब्राह्मण पुजाऱ्यांना झाल्याचं या शिल्पातून साकारण्यात आलं. त्यामुळे जगातील एकमेव चर्चमध्ये ब्राह्मण पुजाऱ्याचा पुतळा साकारण्यात आला.

मिलिंद आरोलकर --


Saturday, 30 November 2019

मुलांना काय हवे असते..!

मुलं ही स्वावलंबी नसतात, मुलांना शेवटपर्यंत आईवडील आणि आईवडिलांनासुध्दा  मुलं  सोबत हवी असतात. ते  एकमेकांवर अवलंबून राहतात. त्याच्यां  आयुष्यात  त्यांना  काही  मिळालं नाही,तर  आईवडिलांना दोष देतात,त्यांच्याकडे लहानसहान हट्ट करतात. मोठं झाल्यानंतर आईवडिलांचा सांभाळ ही करीत नाही.  अनेक कुटुंब असे असतात जिथे फक्त  रक्ताच नात असतं.म्हणून एकत्र राहतात. कोणाला  कोणाविषयी  फारशी आपुलकी नसते. नातं कायम ठेवायच एवढ्यासाठी एकत्र असतात फक्त.
पूर्वी मनाचा तेवढा विचार केला जात नव्हता. आता मात्र प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या मनाचा विचार करीत असते.  त्यामुळे कुटुंबात ताणतणाव  जास्तच वाढलेले दिसतात. फक्त संपत्ती ,पैसा  यापेक्षाही  काहीतरी हवं असतं आजच्या पिढीतील मुलांना,  त्यामुळे ते सतत अस्वस्थ असतात. कुटुंबात  सर्वांना बांधून ठेवणारा  सर्वात महत्वाचा धागा असतो तो म्हणजे प्रेम . कुटुंबातील प्रत्येकाचे  प्रत्येकावर प्रेम असतं ; परंतु ते व्यक्त  कशातूनही करता येत नाही.  कारण कुणाला कुणासाठी वेळच नसतो.  प्रत्येकजण आपआपल्या कामात व्यस्त असतात.   मुलांना आईवडिलांचा  सहवास हवा  असतो तेव्हा तो त्यांना मिळत नाही  आणि आईवडिलांना जेव्हा  मुलांचा सहवास  हवा असतो,तेव्हा  मुलं त्यांच्यापासून दूर असतात. आजच्या मुलांना स्वातंत्र्य हवं असतं त्यांना कुटुंब ही हवं असतं, पण  ते रक्तांच नात आहे म्हणून नाही तर मनाने ,जवळ नाही असं त्यांना वाटतं  खरंतर एकमेकांच्या सहवासाच्या अभावामुळे  त्यांना असं वाटतं . पूर्वी आईवडील जवळ नसले ,तर आजीआजोबा ,काका काकू ,  आत्या त्यांची मुलं  हा सर्व गोतावळा घरात असायचा.  मूल जरा रडायला लागल की, एवढी सर्व माणसं  त्याचे लाड करायची. त्यामुळे एकटेपण नावाची गोष्ट तेव्हा नव्हती.
आज तर सिंगल चाईल्डचाच  काळ आहे.  त्यामुळे त्यांना  सोबत कोणाचीच नसते . मग त्यांच वागणं बदलत जात ,  ते एकटं पडत जात ,त्याचवेळी मनाचा विचार जास्त करू लागत व अस्वस्थ होत जात. कारण आज मुलांच्या गरजा बदलल्या आहेत , त्यांना प्रेम हवं असत ,माया करणारी माणसं हवी असतात.  पूर्वी हे सहज मिळत  असल्यामुळे  ती त्यांची गरज आहे , या पातळीवर विचार करण्याची संधी कधीच मिळत नव्हती . त्यामुळे त्यांच्या मनाचे नेमक काय बिनसलय  हे त्यानांही  कळत नाही त्यामुळेच डिप्रेशन म्हणजेच विमनस्कता  याचे प्रमाण  मुलांमध्ये वाढत चाललय . जो शब्द पूर्वीच्या काळी  मुलांना माहितही नसायचा  आज डिप्रेशनने म्हणजेच विमनस्कतेने  त्यांच्याभोवती  वेढा घातला आहे.


मिलिंद आरोलकर -

Wednesday, 6 February 2019

दुःखाचे कारण

सर्वात दुःखदायक घटना किंवा गोष्ट प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळी असते. ते स्वाभाविकच आहे. शारीरिक दुःखापेक्षा मानसिक दुःखच जास्त बोचरे असते. शारीरिक दुःखावर औषधोपचार करता येतो, जखमा भरल्या जातात आणि ते दुःख नष्ट केले जाते . मानसिक दुःख तसे नसते. ते दुःख नष्ट होत नाही. त्या दुःखाचे विस्मरणही होत नाही. फक्त त्या दुःखाला कुरवाळण्यासाठी दिला जाणारा वेळ आपण कमी करतो एवढेच.
मानसिक दुःख होण्याचे कारण एक व एकच  असते. व्यक्ती तितक्या प्रकूती  या नियमानुसार प्रत्येकाच्या मानसिक दुःखाचे दूश्य,श्राव्य कारण वेगवेगळे असले तरी अंतस्थ कारण एकच असते. लहानमोठ्या गोष्टीबद्दल मानसिक अपेक्षाभंग किंवा मानसिक इच्छापूर्ती झालेली नसल्यामुळेच  हे दुःख झालेले असते. प्रत्येकाला भिडणारे दुःख  हे याच एका कारणाने झालेले असते. एखाद्या क्षणी एखादा थेंब आपल्याला अपेक्षित असतो, पण तो न मिळाल्याने आपल्याला दुःख मात्र हौदभर होते. नंतर केव्हातरी त्याच द्रवाच्या हौदात आपण  अंघोळ करीत असतो, पण आपल्याला आठवत असतो ,सतावत असतो  तो पूर्वी न मिळालेला एक थेंब . त्या न मिळालेल्या  छोट्याशा थेंबाने  आपला अपेक्षाभंग झालेला असतो. आपली इच्छापूर्ती झालेली नसते. त्या थेंबाशी आपल्याला देणेघेणे नसते. आपल्याला दुःख होते ते इच्छापूर्ती झालेली नसल्याने. मनासारखे झाले नाही तर  होणारे दुःख फार मोठे असते.
आपले मन अपेक्षा किंवा इच्छा जोपासते याचे कारण  आपली स्वार्थी बुद्धी हे आहे. मी,माझे, मलाच्या स्वार्थाच्या जाळ्यात माणूस अडकला की मन इच्छा-अपेक्षा करु लागते. इच्छा- अपेक्षांच्या पूर्तीसाठी माणूस प्रयत्न करु लागतो.त्या प्रयत्नांचे पापी प्रयत्नांत रूपांतर होऊन माणूस माणूसपण हरवतो.अशा प्रयत्नानंतरही इच्छापूर्ती होत नाही .मनासारखे  होत नाही त्यामुळे होणारे दुःख देहदंडाहूनही वाईट व भयानक असते. स्वार्थबुध्दीच्या  नियंत्रणाने मानसिक अपेक्षा-इच्छांचे  नियंत्रण होते. त्यामुळे अपेक्षाभंगाचा अनुभव येत नाही. म्हणून दुःखही उद्भवत नाही.


मिलिंद आरोलकर.

Sunday, 27 January 2019

शाळा - महाविद्यालयातील स्नेहसंमेलनाचा घसरता दर्जा.

दरवर्षी जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात  महाविद्यालयात स्नेहसंमेलने होतात.काही महाविद्यायालयांनी स्नेहसंमेलन म्हणजे नुसती " उठाठेव नि डोकेदुखी " बंद केली आहेत. त्यांनी खर म्हणजे अशा संस्कृती- उध्दारक कार्यक्षम शाळा - महाविद्यालयांचा आदर्श घ्यायला हवा , निदान कानठळ्या बसविणाऱ्या  ह्दयविकाराचा तीव्र झटका आणणाऱ्या , गर्भातल्या बाळालाही घाबरवून सोडणाऱ्या  डीजे चे कार्यक्रम वारंवार घ्यावेत . म्हणजे अकारण ज्ञान , विज्ञान , शिस्त , संस्कार आणि सुप्त कलागुणांना वाव  सांस्कृतिक उपक्रम असल्या अनाठायी गप्पानां पूर्णविराम मिळेल.नाही तर अशा धांगडधिंगाणा छाप कार्यक्रमांना वाव कुठे मिळतो ? विद्यापीठ पातळीवर होणाऱ्या सांस्कृतिक स्पपर्धामध्ये एकांकिका , एकपात्री प्रयोग , सुगम संगीत ,चित्रकला,कोलाज यासारखे ज्याला साधना लागते असेच कार्यक्रम  आणि स्पर्धा असतात.
पूर्वी स्नेहसंमेलने व्हायची,त्यामध्ये तर प्राध्यापकांच्या पुढाकाराने तीन अंकी नाटक महिना महिना तलीम  घेऊन  बसविले जायचे.
त्यात रंगभूमीला स्टेजवरचे  आणि बँकस्टेजचे कलाकार निर्माण करण्याची क्षमता असायची.रंगभूमीची शिस्तही अशा मुलामुलींच्या अंगी बाणावली  जायची .आपल्याला स्नेहसंमेलनाच्या  एकांकिकेत  एखादा रोल मिळावा , म्हणून महाविद्यालयात होणाऱ्या  निवडचाचणीसाठीही जय्यत तयारी व्हायची. एकपात्री , सुगम संगीत गायन , नाट्यसंगीत  अशा विविध गुणांचे दर्शन संमेलनामध्ये असायचे. त्याकलेबाबत  मार्गदर्शन , अभ्यास , आणि कष्टपूर्वक तयारी हे  अपरिहार्यच असे. स्नेहसंमेलन आणि पारितोषिक  वितरण सोहळा म्हणजे मर्मबंधातल्या आठवणींचा खजिना असे . काळाच्या ओघात हे सगळे कुठे लुप्त झाले,कळलेच नाही. आता विचारवंत नको , प्रमुख अतिथी म्हणून  लोकप्रिय अभिनेता वा अभिनेत्री हवी असते. सगळ्या उपक्रमांचे कधी बारा वाजले ,हे लक्षातच आले नाही.
फारसे शास्त्रीय अधिष्ठान नसलेली उठवळ गाणी मोठ्या आवाजात वाजवायची. त्यावर स्टेज हादरवून सोडणारी नूत्ये करायची त्याला नूत्य म्हणता तरी येईल का  हा प्रश्न पडतो. असतात ते आचकट विचकट चाळे  आणि लोकांना कर्णबधीर करुन सोडायचे . अशा कार्यक्रमांच्या सादरीकरणात कला अजिबात अंगी नसते , एखाददुसरे नूत्य  खरेच चित्रपटातील नूत्याहूनही सुंदर असू शकते . पण सरसकट पाहिले तर  सावळागोंधळ नि धांगडधिंगाणा  यासदरात मोडणारा  सगळा प्रकार असतो. निदान ज्याला सूजनाची आणि साधनेची गरज एकाग्रता व कष्टाचे मोल द्यावे लागते असे  काही सादर होताना अलिकडे दिसत नाही. म्हणजे  " ती फुलराणी " किंवा " प्रेमा तुझा रंग कसा ? " यातील १० मिनिटांचा प्रवेश सादर करायचा तर उच्चारण ,पाठांतर ,वाचिक ,कायिक अभिनय ,आवाजातले आरोह - अवरोह  ( चढ-उतार ) ,प्रेक्षकांना खिळवून ठेविल अशी नजर आणि मुद्राभिनय  हे सगळे आले .त्यापेक्षा " झिंग झिंग झिंगाट "  हे मोठया आवाजात लावायचे . नि एकानेच काय  १०/२० जणांनी स्टेजतोड नाच करायचा हे कसे सोपे आहे ,छान आहे  आनंद  म्हणावा तर तो गाण्यातला आहे ,चमचमणाऱ्या रंगीबेरंगी प्रकाशझोतांचा , प्रकाशरेषांचा आहे ,थोडाफार नाचातला ही आहे  सारे कसे झिंग आणणारे  असते ,कसली मज्जा असते,जल्लोष असतो. ते ज्या आमच्यासारख्या अरसिकांना  आवडत नाही , ते ओरडत असतात. स्नेहसंमेलनातला स्नेह संपला ,विविध गुणदर्शनातले गुणदर्शन संपले,गुण उधळण राहिली . पण अशा मतांना कस्पटासमान लेखले पाहिजे.
अलिकडे शाळांच्या स्नेहसंमेलनातसुध्दा ९/१० वर्षाच्या चिमुकल्या मुली " अप्सरा आली " किंवा  "चोली के पिछे क्या है "  अशा गाण्यावर नाचवले जाते आईवडिलांना त्याचे किती कौतुक चार शब्द बोलता  नाही आले स्टेजवर तरी चालेल .पण गाण्यावर नाचता आले पाहिजे .ही मुलंमुली त्यालाच कलागुण समजत राहतात , आणि त्याच्या सूजनाच्या आणि साधनेच्या वाटाच बंद होतात. शाळांमध्ये तरी  कलागुणांचे विकसन व्हावे असे उपक्रम व्हावेत कि नाही ? त्यासाठी वेळच नाही. गाणी वाजवायला वेळ लागत नाही ,गाण शिकायला वेळ लागतो . तरुण मंडळे ,राजकीय पक्ष संघटना इत्यादीसुध्दा धार्मिक झिंग आणणारे उपक्रम  आणि रेकॉर्ड डान्स  स्पर्धा चेच  आयोजन करतात. नाहीतर माणसं गोळा कशी होणार.
हल्ली प्रोफेशनल काँलेजेसमध्ये वेलकम् , फेअरवेल असले कार्यक्रम अधूनमधून होत असतात. भरमसाठ वर्गणी वसूल करुन खानपान ,नूत्यधिंगाणा यात रात्र जागविणाऱ्या कार्यक्रमाची तयारी त्यात असते . अगदी महाविद्यालयातील टँँडिशनल डेज् मध्ये सुध्दा डीजेच्या  जोडीला  मद्य ही  आले ,ही गोष्ट आता सर्वश्रुत झाली आहे.सर्वच चांगल्या  उपक्रमाचे " वाजले कि बारा " म्हणायचे फक्त ,की भडक नि भव्य धिंगाणाग्रस्त  उपक्रमांना हद्दपार करून छोटे पण कलासक्ती वूध्दींगत करणारे  कार्यक्रम घ्यायचे ,हे अजूनही शाळा - महाविद्यालय यांच्या हातात आहे .त्यासाठी फक्त इच्छाशक्ती हवी !



मिलिंद आरोलकर.

Sunday, 6 January 2019

बेपर्वाईचे बळी..!

मुंबई  शहर व आसपासच्या परीसरात गेल्या काही वर्षापासून विस्तारिकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक मोठे रस्ते शहरातून जातात,महत्वाचे राष्ट्रीय व राज्य महामार्ग यांस अनेक रस्ते  येऊन मिळतात.शहरातील अरूंद रस्ते  काही ठिकाणी चाललेल त्याच विस्तारीकरणाचे काम होत असतानाच  अपघातांची संख्या वाढत चालली आहे. वाढलेल्या वाहनांची संख्या मोठी असून ,गेल्या वर्षभरात  झालेल्या अपघातात विद्यार्थी व तरुणांचा  झालेला मूत्यू हा चिंतेचा विषय ठरला आहे . मुलांच्या हाती वाहन म्हणजे मूत्यूची चावीच झाली असून ,त्याचा कुटुंब व समाज व्यवस्थेवर गंभीर परीणाम होत आहे.  शहरातील रस्त्याच्या बाजूस गूहनिर्माण संस्था, व्यावसायिक इमारती  व शैक्षणिक संकुलही मोठ्या प्रमाणावर आहेत . शहरात व शहराबाहेर असलेल्या व्यावसायिक शिक्षण संकुलात जाणाऱ्या विद्यार्थी -विद्यार्थीनीचीं संख्या लक्षणीय असून ,हे विद्यार्थी सार्वजनिक वाहनांचा वापर करण्यापेक्षा मोटारसायकलने ये-जा करताना  दिसतात. पालकही मुलांचा येण्याजाण्याचा त्रास  व वेळ वाचावा   या उद्देशाने मोटारसायकल वा अन्य  वाहन घेऊन देतात.मात्र,मुलांकडे हे मोटारसायकल चालविण्याची क्षमता आहे की नाही हे तितकेसे पाहत नाही त. याबाबत पालकही बेफिकीर असून ,आपला मुलगा किंवा मुलगी  वाहन कसे चालवितात याकडे पहायला व विचारायलाही त्यांच्याकडे वेळ नाही.
अनेक मुले व तरुण  पालकांना  चुकवून वाहने घेऊन जातात.नियम व गतीची माहिती नसतानाही शहरात  शहराबाहेर सुसाट वेगाने वाहने चालवितात.त्यामुळे पहाणाऱ्याच्या मनात ही अपघाताची धडकी भरते. मुंबई  महाराष्ट्रातील लहान मोठ्या शहरातील तरुण वर्ग  महाविद्यालयात जाताना सर्रास वापरत असल्याचे पहावयास मिळते. विद्याथ्र्यांनी गाडी वापरण्यास दुमत नाही , परंतु वापरताना,चालविताना जी बेफिकिरी पाहवयास मिळते ती मात्र काळजी करणारी आहे. त्यामुळे मोटारसायकल चालविणाऱ्या  विद्यार्थ्यात जागृती  करण्याची आज गरज बनली आहे.
देशात दरवर्षी रस्ते अपघातात दीड लाखांहून अधिक माणसे मूत्यूमुखी पडत असून , यात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे.या अपघातांमुळे अनेक कुटुंबे उघडी पडत आहेत .शहरात वाहतुकीचे नियम न पाळता अल्पवयीध मुले,विद्यार्थी-विद्यार्थीनी  राजरोसपणे मोटारसायकल चालविताना दिसतात. धूमस्टाईल हायस्पीड चालविण्याची रस्त्यावर जणू स्पर्धाच लागलेली असते.अनेक शाळा महाविद्यालयाच्या  परिसरामध्ये विद्यार्थी-विद्यार्थीनी विनापरवाना  वाहने चालवित आहेत. अशा अल्पवयीन मुलांमुळे बेदरकार वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांमुळे त्यांचा जीव धोक्यात असतोच , मात्र त्यासोबत अन्य वाहनधारक व पादचाऱ्यांनाही  धोका निर्माण होतो , अशा घटनांना आळा घालण्यासाठी  वाहनचालकांवर केवळ दंडात्मक  शिक्षा न करता  गाडीमालक व पालकांवर  कारवाई झाल्यास जरब बसविता येईल . विनापरवाना व विद्यार्थ्यानीं चालविलेल्या वाहनांच्या धडकेत अनेक मूत्यू पावल्याचे व कायमचे अपंगत्व आल्याच्याही घटना पहावयास मिळतात. त्यामुळे वाहन अपघात हा सध्या गंभीर चिंतेचा  विषय झाला आहे. त्यामुळे मुलांना विद्यार्थ्यांना मोटारसायकली देण्याचे  टाळून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करण्यास पालकांनी प्रवूत्त करण्याची अपेक्षा आहे. धूमस्टाईल हायसहायस्पीडने मोटारसायकल चालवणाऱ्या विद्यार्थी व तरुणांवर आता कडक बंधने घालणे गरजेचे आहे. अन्यथा कुटूंबचा आधार नाहीसा होईल.


मिलिंद आरोलकर.

मुंबईतला गिरणी कामगार

गिरणी कामगार मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. कधी काळी मोठ्या प्रमाणात असलेल्या कापड गिरण्यांच्या बळावरच मुंबईला ही ओळख मिळाली. गिरणीचा भोंगा...